पुणे- पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी लंडन येथील एका कार्यक्रमात सावरकर यांच्या विषयी चुकीचे वक्तव्य केले होते. या प्रकरणी राहूल गांधी यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला असून त्याची आज सुनावणी होती.
बदनामीच्या या खटल्यात राहुल गांधी यांनी न्यायालयात उपस्थित रहावे म्हणून पुणे येथील न्यायालयाने राहूल गांधी यांना समन्स जारी केले होते व आज दि. १८/११/२०२४ रोजी पुणे न्यायालयात हजर रहावे असे आदेश केले होते.
फिर्यादी सावरकर यांनी राहूल गांधी यांना पोस्टाद्वारे पाठविलेले समन्स राहूल गांधी यांच्या दिल्लीतील पत्यावर मिळाले असल्याचे फिर्यादी सावरकर यांच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले. राहूल गांधी यांना समन्स मिळाल्याचे कागदपत्रही फिर्यादी यांच्या वकीलांनी न्यायालयात हजर केले. आज समन्स मिळूनही राहूल गांधी न्यायालयासमोर हजर झालेले नाहीत.
म्हणून राहूल गांधी यांना जामीनपात्र वाॅरंट काढावे असा अर्ज फिर्यादी यांच्या वकिलांकडून आज न्यायालयात दाखल केला.
राहूल गांधी यांचे वकील अॅड. मिलींद दत्तात्रय पवार यांनी राहूल गांधी यांच्यावतीने न्यायालयात अर्ज दाखल केला. राहूल गांधी हे संसदेचे विरोधीपक्ष नेते आहेत.
देशातील विविध निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ते देशभर दौऱ्यावर आहेत. समन्स त्यांच्या कार्यालयात मिळाले आहे. परंतु ते दौर्यावर व्यस्त असल्याने आज न्यायालयात हजर राहू शकत नाहीत असा अर्ज मिलिंद दत्तात्रय पवार यांनी न्यायालयात केला.
अॅड पवार यांनी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला. दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी राहूल गांधी यांना न्यायालयात हजर ठेवा असे राहूल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांना आदेश देऊन खटला तहकूब केला. खटल्याची पुढील सुनावणी २/१२/२०२४ रोजी होणार आहे.