नांदेड : राज्यात नुकताच देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ पहिला विस्तार पार पडला. 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 जणांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे ज्या नांदेड जिल्ह्याने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ जागा महायुतीने जिंकल्या. तरीसुद्धा नांदेड जिल्ह्याला यंदा मंत्रीपदच मिळालं नाही.
राज्यात नुकतंच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीला राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिला. 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 236 जागांवर महायुतीने विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाचे तब्बल 132 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले. आणि विशेष म्हणजे ज्या नांदेड जिल्ह्याने शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांच्या रूपाने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले. त्या नांदेड जिल्ह्यात महायुतीने सर्वच्या सर्व 9 जागा जिंकल्या . तरीसुद्धा नांदेड जिल्ह्याला साधं राज्यमंत्रीपदही मिळालेलं नाही.राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर खासदार बनवलं. अशोक चव्हाण यांचे समर्थकदेखील भाजपामध्ये सामील झाले. झाले नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील 9 पैकी 9 महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते.यामध्ये भाजपाचे 5 शिंदेंच्या शिवसेनेचे 3 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 1 आमदार निवडून आला. तरीही नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरत आहे.
नांदेडमध्ये महायुतीचे 9 उमेदवार निवडून आल्यानंतर मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग करण्यात येतं होती. मुंबई आणि दिल्ली वाऱ्या करत नेतेमंडळी मंत्रिपद आपल्यालाच मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. मुखेड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले डॉक्टर तुषार राठोड, नायगाव मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले राजेश पवार, भोकर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण आदिवासी बहुल भागातून अर्थात किनवट विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा भीमराव केराम निवडून आले. तर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेले प्रतापराव पाटील चिखलीकर हे सुद्धा मंत्रीपदासाठी इच्छुक होते. हिंगोली चे माजी खासदार आणि राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार झालेले हेमंत पाटील हे सुद्धा मंत्री पदासाठी इच्छुक होते. परंतु यापैकी कोणाचीच पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागलेली नाही.
मराठवाड्यात सहा मंत्रिपदं देण्यात आली आहेत. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळालंय, तर परभणीतून मेघना बोर्डीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागलीय. तर संजय शिरसाट, अतुल सावे, बाबासाहेब पाटील यांनासुद्धा मंत्रिपदं मिळालीत.विशेष म्हणजे यावर आता अशोक चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन झालं असून अधिवेशनही सुरू झालंय. मंत्रिमंडळाचा विस्तार सर्वसमावेशक झालेला असून अडीच वर्ष काही आमदारांना आणि नंतर अडीच वर्ष काही आमदारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात नांदेडला मंत्रिपद मिळतं का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.