दिल्लीत सुरु असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ हा कार्यक्रम झाला. यात झालेल्या मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. माणसं गोळा करण्याचं काम एकनाथ शिंदेंना दिलं जायचं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की पदं मिळायचं असा सनसनाटी आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. यासह ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.त्यामुळे ठाकरे गटातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर तात्काळ प्रत्यारोप केला. दरम्यान या गंभीर आरोपावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रतिउत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, हे सगळे गयेगुजरे लोकं आहेत. त्यांनी स्वतः चांगभल करून घेतलं आहे. त्या महिला आहेत त्यावर मी काही बोलणार नाही. मर्सिडिजमधून फिरणाऱ्या लोकांना विचारा लाडक्या बहिणींना पैसे का नाही मिळाले? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. स्वतः मर्सिडिजमधून फिरतायत मग लाडक्या बहिणी का उपाशी राहिल्या? असा प्रश्नही ठाकरेंनी विचारला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील निलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर दिलंय. निलम गोऱ्हे यांना उद्धव ठाकरेंनी 4 वेळा आमदार केले. त्यांनी किती मर्सिडिज दिल्या? 8 मर्सिडिज दिल्या का? त्याच्या पावत्या त्यांनी आणून दाखवाव्यात असं संजय राऊत म्हणाले. तर सुषमा अंधारे म्हणाल्या की, नीलम गोऱ्हे आमच्या पक्षात असताना बराच आर्थिक व्यवहार चालायचा. सर्वात जास्त कमाई गोऱ्हे यांनीच केली असावी. नीलम गोऱ्हे सदासर्वकाळ मातोश्रीवर पडीक होत्या. असा प्रत्यारोप अंधारे यांनी केला केला.