Neelam Gorhe

समाजासाठीची तळमळ महत्वाची- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

125 0

नागपूर: राजकारणात आणि समाजकारणात अनेक लोक आपला स्वतःचा पेशा सोडून येत असतात. मी ही त्यापैकी एक आहे. राजकारण, समाजकारण करण्याची आवड मनात असली की, लोक झपाटून काम करतात. अशा झपाटलेल्या लोकांचा अनुभव या क्षेत्राने आणि या सभागृहांनी घेतलेला आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केले. विधान परिषदेतील पाच सदस्यांच्या निरोप समारंभात आपले मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आज विधान परिषदेतून शिक्षक आमदार विक्रम काळे, नागोराव गाणार आणि बाळाराम पाटील तर पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. रणजीत पाटील सेवानिवृत्त होत आहेत. या सर्वांना भविष्यातील वाटचालीच्या शुभेच्छा देतानाच उपसभापती म्हणाल्या की, डॉ. रणजीत पाटील हे पेशाने डॉक्टर आहेत. मी सुद्धा पेशाने डॉक्टर आहे पण राजकीय, सामाजिक क्षेत्रात काहीतरी करण्याची तळमळ स्वस्थ बसू देत नसल्यामुळे या ठिकाणी आले. काल-परवापर्यंत तुमच्यासोबत सभागृहात खांद्याला खांदा लावून सामान्यांचे प्रश्न उचलत होते. आज उपसभापती या नात्याने वेगळी जबाबदारी आणि वेगळं पद मिळालं असलं तरी पण आपणही यापैकीच एक आहोत आणि लोकांसाठी आपण इथे बसलेलो आहोत. ही जाणीव आणि भान सातत्याने होत असतं. त्यामुळेच सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही कोपऱ्यात बसलेल्या प्रत्येक सदस्याला त्याचे प्रश्न, मुद्दे, समस्या मांडण्याची समान संधी मिळावी याकडे माझा कल असतो. आपल्यापैकी प्रत्येक जण तळमळीने आणि भरभरून काम करत असतो. बहुतांश सदस्यांची ही दुसरी – तिसरी टर्म आहे. अनेक लोक एक दशकाहून अधिक काळ या सभागृहाचे सदस्यत्व उपभोगून आता सेवानिवृत्त होत आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मतमतांतर होत असतात परंतु मनात असलेली तळमळ आणि लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा, भावनेने प्रेरित होऊन आपल्यापैकी सर्वजण काम करत असतात आणि या कामांना समाजातून मतदारांकडून वेळोवेळी पावती मिळत असते, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. तसेच निवृत्त होणाऱ्या पाचही सदस्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!