मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याविरोधात 72 तासांच्या आत पोलिसांनी दोन खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोपही ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.
हर हर महादेव चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मारहाण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर ठाणे जिल्हा न्यायालयाकडून जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला होता.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
त्या नंतर आता ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. याच कार्यक्रमात आव्हाडांविरोधात तक्रार करणारी महिलाही उपस्थित होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा तक्रारदार महिलेनं केला आहे. 40 वर्षीय तक्रारदार महिलेनं या कार्यक्रमात आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलिसांनी महिलेला तक्रार दाखल करण्यास सांगितलं. दरम्यान, मुंब्रा पोलीस ठाण्यात महिलेनं जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.