मला देशमुख यांनीच बोलावलं होतं’; अनिल देशमुख यांच्या आरोपांवर समित कदमांचा पलटवार

380 0

अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘देवेंद्र फडणवीस यांचा एक माणूस माझ्याकडे प्रतिज्ञापत्र घेऊन आला होता. पण मी त्यावर सही केली नाही’, असा आरोप त्यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेला हा माणूस समित कदम असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. आज त्यांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो दाखवत फडणवीसांवर गंभीर आरोप केले. तर आता समित कदम यांनी देखील अनिल देशमुखांवर आरोप केले आहेत.

 

जनसुराज्य शक्तीचे युवा अध्यक्ष समित कदम अनिल देशमुखांबाबत बोलताना म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून मी अनिल देशमुख यांना भेटायला गेलो नव्हतो. उलट देशमुख यांनीच मला बोलावले होते. त्यांनी बोलावल्यानंतर आपण त्यांची भेट घेतली.’ त्याचबरोबर ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपल्या अडचणी कमी करता येतात का पाहा? अशी विनंती देशमुखांनी यांनी केली असल्याचा दावा देखील कदम यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘अनिल देशमुख हे तत्कालीन गृहमंत्री होते. त्यांना झेड प्लस सिक्युरिटी होती. त्यांनी बोलवल्याशिवाय त्यांना मी भेटूच शकत नाही. त्यामुळे 3 वर्षांपूर्वीच्या भेटीबद्दल आता बोलून ते फडणवीस यांना टारगेट करत आहेत का की कोणता नरेटीव्ह त्यांना सेट करायचा आहे हे त्यांनाच माहीत.’ या सगळ्या प्रकरणात आणि अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा काहीही संबंध नसल्याचे कदम म्हणाले आहेत. त्यामुळे आता कदमांनी केलेले या आरोपांना अनिल देशमुख काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!