वक्फ विधेयक मुस्लिमांच्या हिताचे असेल, तर तुम्ही हिंदुत्व सोडले का, असा जळजळीत सवाल शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
मोहम्मद अली जिन्ना यांना जे जमले नाही, ते भाजपने करून दाखवले, अशी टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले की, आम्ही बिलाला विरोध केला नाही तर भाजपच्या ढोंगाला आणि त्यांनी भ्रष्टाचाराला विरोध केला. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे आणि हिंदुत्वाचे काय देणे घेणे? असा सवाल त्यांनी केला. तुम्ही मुसलमानांचे लांगुलचलन करत असाल तर हिंदूंनी काय केले, असेही त्यांनी विचारले.
ईदच्या मेजवान्या झोडून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडले. ईदच्या मेजवान्या झोडून या लोकांनी काल वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडले आहे. मात्र, यामध्ये मंत्री किरण रिजिजू यांनी हे विधेयक मांडले हा योगायोग आहे. याच किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचे समर्थन केले होते. त्यामुळे हा योगायोग घडवून आणला आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नेमके भारतीय जनता पक्ष काय करतोय, हे देखील मला अद्याप कळाले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने लादलेल्या कराचा विषय बाजूला केला
अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात शुल्क लादले आहे. मात्र हा विषय बाजूला टाकण्यासाठीच वक्फ विधेयक विषय आणण्यात आला. अमेरिकेच्या भूमिकेबाबत संसदेत चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ही चर्चा केली नसल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेने लादलेल्या शुल्काबाबत देशाच्या पंतप्रधानांनी किंवा अर्थमंत्र्यांनी सभागृहाला अवगत करायला हवे होते, असेही ठाकरे यांनी म्हटले.