संपादकीय लेख!; हरयाणात काँग्रेसला फटका, ‘मविआ’त नाराजीचा फटाका!

819 0

तिकडं हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि इकडं महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत नाराजीचा फटाका फुटला. हरयाणाच्या पराभवातून काँग्रेसला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतील. हरयाणाच्या निकालानंतर आता तरी कुणी स्वतःला मोठा भाऊ किंवा कुणाला छोटा भाऊ समजू नये. काँग्रेसला स्वबळावर लढायचं असल्यास त्यांनी तसं जाहीर करावं म्हणजे इतर पक्ष देखील आपापली भूमिका मांडतील, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला चांगलंच डिवचलं! हरयाणात 48 जागा जिंकून सत्ता राखण्यात यशस्वी ठरलेल्या भाजप आणि महायुतीच्या इतर पक्षांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय तर हरयाणा निकालानं आधीच हताश झालेल्या काँग्रेसला महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना आणखी निराश करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. Haryana निकालावरून महाविकास आघाडीत आता शीतयुद्ध सुरू झालं असून त्याचा पहिला फटाका Sanjay Raut यांनी फोडलाय. संजय राऊत काँग्रेसला का डिवचतायत? ते असे काँग्रेसशी का बरं फटकून वागतायत? ठाकरेंच्या शिवसेनेचा हा माईंड गेम नक्की आहे तरी काय? पाहूयात Top News मराठीचा स्पेशल रिपोर्ट… हरयाणात काँग्रेसला फटका, ‘मविआ’त फुटला नाराजीचा फटाका!

हरयाणा निवडणूक निकालादिवशी सुरुवातीला काँग्रेसच्या बाजूनं कल यायला सुरुवात होताच संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधला. मोदींची कृत्रिम हवा आता संपुष्टात आलीये, असा सूर आळवला पण दुपारनंतर कलांचं चक्र भाजपच्या बाजूनं फिरलं आणि संजय राऊतांनी 360 डिग्रीप्रमाणं आपला सूरही बदलला.
आधी भाजपला फटकारणारे राऊत नंतर चक्क काँग्रेसवर घसरले. हरयाणाच्या पराभवातून काँग्रेसला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतील. हरयाणाच्या निकालानंतर आता तरी कुणी स्वतःला मोठा भाऊ किंवा कुणाला छोटा भाऊ समजू नये. काँग्रेसला स्वबळावर लढायचं असल्यास त्यांनी तसं जाहीर करावं म्हणजे इतर पक्ष देखील आपापली भूमिका मांडतील, असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राततील काँग्रेसच्या नेत्यांचे कान ओढायला सुरुवात केली. हरयाणा निकालाच्या दुसऱ्याच दिवशी हातभर अग्रलेख लिहून काँग्रेसच्या ओल्या जखमेवर मीठ चोळलं…
“जिथं आपण मजबूत आहोत असं काँग्रेसला वाटतं, तिथं सहकारी पक्षाला बाजूला सारून, हा पक्ष स्वबळावर निवडणूक लढतो आणि कमजोर ठिकाणी आघाडीचं धोरण स्वीकारतो. हरयाणातील कोणत्याही निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं जागरूक नेतृत्व आहे, असं म्हणत राऊतांनी राज्यात काँग्रेसचं नेतृत्व नाही किंवा काँग्रेस पक्षाला कुणी मोजत नाही, असं दाखवून दिलं. इतकंच नव्हे तर काँग्रेसनं हरयाणाची निवडणूक कशी लढायला हवी होती, याचा सल्ला देखील देऊन टाकला. हरयाणात आघाडी चांगल्या पद्धतीनं झाली असती. तसं झालं असतं तर सप, आप किंवा एखादी जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असती, त्याचा फायदा आघाडी म्हणून काँग्रेसला झाला असता. पण, आम्ही एकतर्फी जिंकू, आम्हाला कुणाची गरज नाही, असं काँग्रेसला वाटलं. जिथं काँग्रेस कमजोर असते, तिथं मात्र प्रादेशिक पक्षाची मदत घेणं, हे काँग्रेसचं धोरण राहिलंय.
हरयाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वास आणि स्थानिक नेत्यांच्या अरेरावीमुळं झाला. हरयाणात पुन्हा भाजपचं सरकार येईल असं कुणीच ठामपणे म्हणत नव्हतं. काँग्रेसचा एकतर्फी विजय होईल, असं एकंदरीत वातावरण होतं; पण जिंकलेल्या डावाचं पराभवात रूपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडूनच शिकावं लागेल. राजकारणात व निवडणुकीत संघटन जमिनीवर असावं लागतं, असं काहीच्या बाही म्हणून राऊतांनी काँग्रेसला कमी लेखण्याचा प्रयत्न केलाय. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हरयाणातील निकालापासून शिकावं असं बरंच काही आहे. हरयाणात काँग्रेसनं ‘आप’सह अनेक घटकांना दूर ठेवलं. त्यांना सत्तेत वाटेकरी नको. त्यामुळं या खेळात संपूर्ण राज्यच हातचं गेलं. हे चित्र ‘इंडिया आघाडी’साठी बरं नाही, पण लक्षात कोण घेणार?”, असं म्हणून काँग्रेसला धू धू धुतलं.

संजय राऊतांनी काँग्रेसच्या विरोधात नाराजीचा फटाका फोडून काँग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न का केला असावा हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत
जागावाटपात जास्तीत जास्त जागा आपल्या झोळीत कशा घालता येईल, याचा प्रयत्न ठाकरे गटानं सुरू केलाय हे त्याचं सरळसरळ उत्तर आहे.

आता संजय राऊतांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वाच्या खुर्चीखालीच फटाका फोडल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तरी कसे गप्प बसणार? राऊतांच्या या भूमिकेवर नाना पटोले यांनीही पलटवार केलाय. ‘ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काय बोलतात, काय लिहितात याकडं आम्ही लक्ष देत नाही,’ असं म्हणून पटोलेंनी राऊतांना महाराष्ट्र आणि हरयाणा यातील फरक कळत नाही, अशी पुस्तीही जोडली. नानाभाऊ इतक्यावरच थांबले नाहीत तर आपण राऊतांना त्यांच्या वक्तव्याचा जाब विचारणार असल्याचंही म्हणाले. ‘महाविकास आघाडीत आपण समन्वयानं काम करत आहोत. त्यातून चांगला संकेत जावा, असा माझा राऊतांना सल्ला आहे. महाराष्ट्रात निवडून येण्याची क्षमता या निकषानुसार जागावाटप व्हावं, अशी आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे आणि त्यानुसारच काम सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार जागरूक आहेत, असं राऊत यांना का सांगावे वाटत, हाही त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेस पक्ष अहंकारी नसून, खरे अहंकारी लोक सत्तेत बसले आहेत,’ असा टोला पटोले यांनी महायुतीला लगावला

एकूणच काय तर राऊतांच्या या भूमिकेमुळं महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे, असं म्हणणं घाईचं ठरेल. कारण हरयाणा निकालानंतर आघाडीत सुरू झालेल्या शीतयुद्धात आता कुठं पहिला फटाका फुटलाय. उद्या-परवा या शीतयुद्धाचा जोर वाढलाच तर फटाक्यांची माळही लागू शकते.

संदीप चव्हाण,वृत्तसंपादक TOP NEWS मराठी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!