ANJALI DAMANIYA: मंत्रालयात अजूनही मंत्री म्हणून धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी. अंजली दमानियांचा आक्षेप
मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दोन महिने लोटूनही मंत्रालयात त्यांच्या नावाची पाटी कायम आहे. मुंडे मंत्रिपदी नसतानाही त्यांच्या नावाचे कार्यालय कसे? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनजंय मुंडे यांच्याशी निकटचा संबंध असलेल्या वाल्मीक कराडला अटक झाली होती. मुंडे यांनी सुरुवातीला या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे दाखवून मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. मात्र, संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, राजीनामा देऊन दोन महिने लोटूनही मंत्री म्हणून त्यांच्या नावाची पाटी कायम आहे.
याबाबत आक्षेप घेऊन अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारला देखील गेला. मग अजूनही मंत्रालयात त्यांच्या नावाचे कार्यालय कशासाठी? आणि मंत्री म्हणून पाटी कशासाठी? असा सवाल त्यांनी या व्हिडिओ पोस्टमधून उपस्थित केला आहे.