विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं. या निवडणुकीत त्यांना खातंही उघडता आलं नाही. लोकसभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. ज्याचा महायुतीला मोठा फायदा झाला. मात्र विधानसभेत स्वतंत्र लढलेल्या मनसे (MNS) पक्षाचा मोठा पराभव झाला. यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra fadnavis) यांनी भाष्य केलं आहे.
‘शक्य असल्यास स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेला सोबत घेऊन’, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘लोकसभेत मनसेने आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला. त्याचा आम्हाला फायदाही झाली. मात्र विधानसभेत त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता की त्यांनी निवडणुका लढल्याच नाहीत तर पक्ष चालणार कसा? महायुतीत आम्ही तीन पक्ष असल्याने आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागा नव्हत्या. त्यामुळेच स्वतःच्या पक्षासाठी वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला”.
मनसेला सोबत घेणार ?
राज ठाकरेंना सोबत घेणार का या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘इतक्या मोठ्या प्रवाहाविरोधात लढूनही मनसेच्या उमेदवारांना चांगली मतं मिळाली आहेत. त्यांच्या अनेक उमेदवारांनी चांगली मतं घेतली. त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात जुळतात. त्यामुळे मनसेला सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. त्यामुळेच स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिथे शक्य असेल तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू.’