मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला केंद्रातील मोठे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यातील महायुतीचे नेते उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक कलाकार आणि खेळाडू देखील उपस्थित होते. मात्र शपथविधी सोहळ्याला विरोधकांपैकी कोणीही हजर नव्हतं. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षातील आमदार किंवा मोठे नेते उपस्थित नव्हते. यावरच प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं. उद्धव ठाकरे (uddhav thackeray), शरद पवार (sharad pawar) यांना देखील निमंत्रणासाठी फोन केला होता, असं स्पष्टीकरण दिलं.
नियमानुसार, लोकशाहीत मंत्रिमंडळाच्या शपथविधीला विरोधी पक्षालाही निमंत्रण द्यावे लागते. त्यानुसार शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांना निमंत्रण दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये काय बोलणं झालं ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना शपथविधीचा निमंत्रण देण्यासाठी फोन केला होता. ‘उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. माझं अभिनंदन केलं. आम्हा दोघांमध्ये चांगलं बोलणंही झालं. त्याचबरोबर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सहकार्य करू’, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
शरद पवारांनाही केला फोन
शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. नियमानुसार विरोधी पक्षातील नेत्यांनी शपथविधीला हजेरी लावायची असते. त्यामुळे शरद पवार हे उपस्थित राहतील अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र ते देखील उपस्थित राहिले नाहीत याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मात्र ते म्हणजे फडणवीस यांनी स्वतः शरद पवार यांना फोन केला होता. त्यावेळी या दोघांमध्ये काय बोलणं झालं याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली. ‘संसदेचा हिवाळी अधिवेशन असल्याने आपण शपथविधीला येऊ शकणार नाही. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी अनेक शुभेच्छा’, असं शरद पवार म्हणाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला गेले होते फडणवीस
2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना ठाकरे यांच्या शपथविधीला आपण गेलो होतो, हे फडणवीस यांनी आवर्जून सांगितलं. त्याचबरोबर देखील विरोधी पक्षातील नेते शपथविधीला आले असते तर आपल्याला आनंद झाला असता, असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.