मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एकच खळबळ उडवली आहे. या घटनेवर राजकीय नेते, राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहेत. देशमुख यांचा मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे. याच प्रकरणात आता बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Baba Dhirendra Shastri) यांनी उडी घेतली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी देखील या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे नुकतेच जळगावच्या धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावात आले होते. या गावात धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम पार पडला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. त्यावेळी त्यांना संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं की, ‘माणूस आहे पण माणसांमधली माणुसकी मरत चालली आहे. आधीच्या काळात माणसं कमी होती पण माणुसकी जास्त होती. आज माणसं जास्त आहेत, मात्र माणुसकी मरण पावली आहे. माणुसकी मरत असल्याने कृत्य आणि अपराध वाढत आहेत. हा देशातील चिंतेचा विषय बनला आहे.’
महिला अत्याचारांवर भाष्य
यावेळी बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले, ‘अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, अपहरण यांसारखे गुन्हे वाढत आहेत. अशा प्रकारचे गुन्हे कमी व्हावेत यासाठी कठोर शिक्षा व्हायला हवी. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे हा योग्य उपाय आहे. बरोबर अशा गुन्ह्यांबाबत समाजात जनजागृती व्हायला हवी.’