महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निकालाने सर्वांनाच आश्चर्य चकित केलंय. एक्झिट पोल फेल ठरले तर मोठ्या नेत्यांवरही घरी बसण्याची वेळ आली. मात्र या ऐतिहासिक निवडणुकीने राज्याला सर्वात तरुण आमदार दिला. ज्याचं नाव आहे रोहित आर आर पाटील.. आर आर आबांचा लेक निवडून आला याची राज्यभर चर्चा सुरू आहे. त्यामुळे याच रोहित पाटलांचा संपूर्ण परिचय आज आपण जाणून घेणार आहोत..
अवघ्या 25 व्या वर्षी रोहित पाटील हे मोठ्या मताधिक्याने आमदार झालेत. रोहित पाटील हे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव आहेत. रोहित पाटलांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर वडिलांच्या वरशाप्रमाणे ते सुद्धा राजकारणात आले. अगदी स्थानिक पातळीपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. 2022 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये रोहित पवार यांच्या नेतृत्वात कवठेमहांकाळ नगरपंचायतीत 17 पैकी 10 जागांवर विजय मिळाला होता. तेव्हापासूनच यंदाच्या निवडणुकीत रोहित पाटलांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू झाली होती. आणि अखेर शरद पवारांनी रोहित पाटलांना उमेदवारी दिलीच.
रोहित पाटलांनी एक लाख 26 हजार मत मिळवत दणदणीत विजय मिळवला. मात्र त्यासाठी त्यांच्यासमोरची आव्हानही तितकीच मोठी होती.
1990 पासून तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात पाटील कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे. याच मतदारसंघातून आर आर पाटील यांनी सलग दोन वेळा हॅट्रिक केली आहे. त्यांच्या निधनानंतर लाभलेल्या पोटनिवडणुकीत पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या विजयीही झाल्या. 2019 ला पुन्हा सुमन पाटील निवडून आल्या. त्यानंतर आता 2024 ला रोहित पाटील हे विजयी झाले. आर आर पाटलांचे विरोधक मानले जाणारे संजय काका पाटील हेच रोहित पाटलांचे ही विरोधक होते. मात्र संजय पाटलांसारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करत रोहित पाटलांनी तासगाव मतदारसंघात पाटील घराण्याचं वर्चस्व राखून ठेवलं. निवडून आल्यानंतर हा विजय त्यांनी आपल्या स्वर्गीय वडिलांना समर्पित केला. त्यामुळेच सध्या सगळीकडे आर आर आबांच्या लेकाची चर्चा होत आहे.
एकीकडे महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांचे गड ढासळत असताना दुसरीकडे या युवा नेत्याने पहिल्याच प्रयत्नात विधान भवनाचे दार ठोठावलं. रोहित पाटलांना पराभूत करण्यासाठी महायुतीने सर्व शक्य प्रयत्न केले. मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी त्यांचाच नावाचे चक्क तीन अपक्ष उमेदवार ही उभे केले. मात्र त्यानंतरही 27 हजारांच्या मताधिक्याने रोहित पाटील निवडून आले. त्यामुळे आता या तरुण तडफदार नेत्याकडून महाराष्ट्राला प्रचंड अपेक्षा आहेत.