लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांच्या पुत्राविरोधात महायुतीने सदा सरवणकर या दिग्गज नेत्याला उमेदवारी दिली. त्यामुळे सध्या हे मतदार संघाची राज्यभरात चर्चा आहे. अमित ठाकरे विरोधात महायुती उमेदवार देणार नाही याची शक्यता होती मात्र तरीही महायुतीने तगडा उमेदवार दिला. तर सरवणकर हे आपला अर्ज मागे घेतील अशी देखील शक्यता होती मात्र त्यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितलं. मात्र आता हेच सरवणकर माघार घ्यायला तयार आहेत. पण त्या बदल्यात त्यांनी राज ठाकरे यांना मोठी अट घातली आहे.
महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, अशी इच्छा मनसे नेत्यांची होती. त्या अनुषंगानेच मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका झाल्या असून त्यानंतर आता मी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार आहे. मात्र माझी एक अट आहे ती म्हणजे माहीम मधून मी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर मनसेने देखील महायुतीच्या विरोधातील उमेदवार मागे घ्यावेत, अशी अट सदा सरवणकर यांनी ठेवली आहे.
याबाबत बोलताना सदा सरवणकर म्हणाले, ‘या निवडणुकीत मी त्याग करायला तयार आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणं महत्वाचं आहे. त्यासाठीच मनसेने ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत त्यांनी माघार घ्यावी. माहितीच्या विरोधातील उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यास मीदेखील माझ्या पक्षासाठी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे. मात्र मनसेने आमच्या विरोधात उमेदवार देऊन उलट आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करू नये. सगळीकडे आमच्या विरोधात उमेदवार उभे करून आमच्याकडूनच सहकार्याची अपेक्षा ठेवणं हे योग्य नाही. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी एक एक आमदार महत्त्वाचा आहे’, असं सरवणकर म्हटले आहेत.
यामुळेच आता सरवणकर यांच्या या भूमिकेवर राज ठाकरे कोणता निर्णय घेतात आणि मनसे महायुती विरोधातील उमेदवार मागे घेणार का ? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.