Maharashtra Politics

पुण्यात महाविकास आघाडीला बंडखोरांचं ग्रहण; उमेदवारांचं वाढलं टेन्शन

198 0

विधानसभा निवडणुकांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलंय. 65 ते 70 टक्के जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत. पुण्यात देखील आठ पैकी सात जागांवरचे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत मात्र उमेदवार जाहीर होताच महाविकास आघाडीला बंडखोरांचं ग्रहण लागलंय. जे बंडखोर आता अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढवणार आहेत. कोण आहेत असे बंडखोर आणि त्यांचा अधिकृत उमेदवारांना काय फटका बसू शकतो पाहूया…

बंडखोरांच्या यादीतलं पहिलं नाव आहे काँग्रेस मधून नगरसेवक पद भूषवलेल्या आणि पुण्याच्या पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे यांचं.. कमल व्यवहारे या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. मात्र त्यांना उमेदवारी नाकारून कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे व्यवहारे नाराज झाल्या. याबाबतीत त्यांनी लिहिलेल एक पत्र व्हायरल होत आहे. 10 वर्षात 5 पक्ष बदलून आलेली मंडळी पक्षापेक्षा स्वतःला मोठी समजू लागल्याचा फटका लोकसभेला बसला, आता त्यांना कसबा विधानसभेची उमेदवारी देण्यात आली असल्याचं म्हणत कमल व्यवहारे यांनी नाराज व्यक्त केली आहे. तर कालच त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. कमल व्यवहारे या काँग्रेसमध्ये होत्या, त्यातच त्यांना परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा मिळू शकतो. याबाबतची चर्चा देखील त्यांनी केलेली आहे. त्यामुळेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या मतदारांच्या मतांचा परिणाम रवींद्र धंगेकर यांच्या मतांवर अधिक तर हेमंत रासने यांच्या मतांवर कमी होऊन शकतो.

या यादीतलं दुसरं नाव आहे मनीष आनंद यांच…

मनीष आनंद हे काँग्रेसचे माजी नगरसेवक असून 2019 ला देखील ते छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातून इच्छुक होते. मात्र त्यावेळी काँग्रेसने दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिली. त्यावेळी मनीष आनंद यांनी दत्ता बहिरट यांना निवडून येण्यासाठी पूर्ण मदत करावी तर 2024 ला मनीष आनंद यांना उमेदवारी देऊ, तेव्हा दत्ता बहिरट हे मनीष आनंद यांना मदत करतील. असं काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत ठरलं होतं. मात्र दिलेला शब्द न पाळता दत्ता बहिरट यांनी आता पुन्हा उमेदवारी मागितली आणि पक्षाने त्यांना उमेदवारी दिलीही. त्यामुळेच मनीष आनंद हे नाराज असून त्यांनी अपक्ष अर्ज देखील दाखल केला आहे. ज्याचा फटका दत्ता बहिरट यांच्या मतांवर बसणार आहे.

या बरोबरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्तार शेख हे देखील कसब्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्याने ते नाराज असून त्यांनी अपक्ष अर्ज देखील भरला आहे. त्याचबरोबर त्यांनी जरांगे पाटलांची देखील भेट घेतली असून त्यांना जरांगे पाटलांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास काँग्रेसच्या मतांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो

कमल व्यवहारे आणि मनीष आनंद यांनी कसबा पेठ आणि छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरले आहेत. या दोन्ही मतदारसंघांमधली आत्ताची परिस्थिती पाहता काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतांचं विभाजन होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याने महाविकास आघाडीला जास्त फटका बसू शकतो. याव्यतिरिक्त काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये आणखी काही नाराज आहेत जे बंडखोरी करू शकतात.. कोण आहेत हे नाराज पाहूया…

2009 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवून हडपसरचे आमदार झालेले महादेव बाबर हे यंदाही इच्छुक होते. मात्र जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटल्यामुळे या ठिकाणी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे महादेव बाबर हे नाराज आहेत. ते देखील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची शक्यता असल्यामुळे महादेव बाबर यांचे बंड थोपवणं हे महाविकास आघाडीला जड जाणार आहे.

पुढचं नाव आहे काँग्रेस नेते आबा बागुल यांचं…

आबा बागुल हे अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील ते इच्छुक होते मात्र त्यावेळी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या आवा बागुल यांनी तेव्हाही बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला व नंतर त्यांनी माघार घेतली. तसंच काहीसं आताही घडलं आहे. पर्वती विधानसभेतून शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांना उमेदवारी मिळाल्याने आमदारकीसाठी इच्छुक असलेले आबा बागुल पुन्हा नाराजांच्या यादीत जाऊन बसले आहेत. ते देखील निवडणूक लढवण्यावर ठाम असून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी कडून उमेदवारी न मिळालेले अनेक इच्छुक नाराज असले तरीही बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेली ही चार-पाच नाव सध्या समोर येत आहेत.
यापैकी काही उमेदवार अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून काही जण तिसऱ्या आघाडीबरोबर तर काहीजण जरांगे पाटलांबरोबर जाऊ शकतात. मात्र या सगळ्याच बंडखोरांचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना थेट फटका बसणार आहे. त्यामुळेच आता महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांसमोर या बंडखोरांचा बंड थंड करण्याचं आव्हान निर्माण झालंय.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!