Asim Sarode

‘शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या सांगण्यानुसार मनोज जरांगेंशी चर्चा केल्याचे वृत्त निराधार’- ॲड. असीम सरोदे 

185 0

पुणे: बारामती येथील ‘निर्भय बनो’ च्या सभेत बोलताना गुरुवार दिनांक 14 नोंव्हेंबर रोजी मी विधानसभा निवडणूक न लढण्याबाबत मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर भाष्य करतांना त्यांनी अतिशय योग्य सामाजिक-राजकीय भूमिका घेतली असे मत मांडले होते.

“मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचा खूप मोठा फायदा लोकशाही व संविधानाला होणार आहे. लोकशाही वाचवण्याच्या आमच्या मोहिमेत जरांगे पाटलांचा मोठा हातभार राहणार आहे.” असेच मी मनोजदादा जरांगे यांच्यासोबत झालेल्या दीर्घ मीटिंगनंतर अनेक सभांमधून सांगितले आहे.

‘निर्भय बनो’च्या माध्यमातून आम्ही राज्यभरात फिरत असताना जरांगे यांची निवडणुकीत उमेदवार देण्याच्या भूमिकेबाबत अनेकांनी माझी भेट घेऊन सांगितले की निवडणुकीच्या राजकारणात जरांगे उतरले तर त्यांच्या आंदोलनाला तडा जाऊ शकतो, तुम्हाला शक्य असल्यास त्यांच्याशी बोलावे.

त्यामुळेच विधानसभेला जरांगे यांनी निवडणुकीसाठी उमेदवार देणे आणि त्यातून मतांचे विभाजन होणे हे योग्य ठरणार नाही. मनोजदादांनी आंदोलक व प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी झटणारा माणूस ही त्यांची प्रतिमा कायम ठेवावी हेच मी त्यांना आमची बैठक झाली तेव्हा सांगितले.

आम्ही लोकसभेच्या वेळी निर्भय बनो च्या तब्बल ७८ सभा महाराष्ट्रात घेतल्या आणि मतदारांमध्ये लोकशाहीसाठी चेतना जागृत केली. विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे मत विभाजन करून हरियाणासारखी परिस्थिती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. म्हणजे एकीकडे मनोज जरांगे आणि मराठा आंदोलनाची विश्वासार्हता तोडायची व दुसरीकडे जरांगे यांनी निवडणूक उमेदवार उतरवून त्यांचे आंदोलान पूर्ण तोडायचे हे षडयंत्र होते. याचा फायदा कोणाला होईल? संविधान वाचवायचे असं तर जरांगे पाटलांना भेटलं पाहिजे म्हणून मी जरांगे पाटलांकडे गेलो. जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करावेत असं कुणाकुणाला वाटत होते त्यांची यादी काढा असं त्यांना म्हणालो.

सगळ्यात प्रकर्षाने देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती. दुसरे होते महाजन, तिसरे होते लक्ष्मण हाके, उदय सामंत अशा काही लोकांची यादी काढली तर त्यांना जरांगे पाटलांचा राजकीय फायदा घ्यायचा आहे हे स्पष्ट दिसत होते.

तुम्ही समाजात फूट पडू देऊ नका व त्यापेक्षा समाज परिवर्तनासाठी झगडणारा प्रामाणिक माणूस ही प्रतिमा सोडू नका असे मी त्यांना सुचविले होते.

विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिल्यानंतर याचा फटका मराठा आंदोलनाला बसू शकतो तसेच यामुळे लाखो बांधवांचे भविष्य धोक्यात येऊ शकते याचा विचार करून मनोज जरांगे यांनी निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय स्वतः घेतला आहे. पण त्यासाठी मी कारणीभूत असेल तर १३८ जागांवर जो वाईट परिणाम करण्याचा डाव फडणवीस यांच्या मनात होता तो असफल झाल्याने ते खोट्या बातम्या पसरवीत आहेत.

अशी वस्तुस्थिती असताना काही वृत्तपत्रे, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी चुकीचे वार्तांकन करत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसारच मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो आणि उमेदवार न देण्याबाबत चर्चा केली असे वार्तांकन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेकांचा गैरसमज झाला आहे.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!