2019 ते 2024 हा कालखंड महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वांत अस्थिर कालखंड म्हणून गणला जाईल. बहुमत युतीला; सत्तेत आघाडी, तीन-तीन मुख्यमंत्री आणि मग धक्क्यामागून राजकीय धक्के… पाहाता पाहाता पाच वर्षे सरली आणि 2024 ची विधानसभा निवडणूक लागली. या पाच वर्षांत कोणत्या पक्षानं काय कमावलं, काय गमावलं? राजकीय पक्षांनी नेमकं काय साधलं? पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट… ‘काय कमावलं? काय गमावलं? 05 वर्षांत 07 पक्षांनी काय साधलं?
भाजप : लढाई 2024 ची; लक्ष्य 2029!
2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल एकदाचा लागला; तो भाजप-शिवसेना युतीच्या बाजूनंही लागला पण हा निकालच पुढं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यास कारणीभूत ठरला! मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटीवरून युती तुटली आणि भाजपची सत्तास्थापनेची संधी हुकली. तरी देखील ‘मी पुन्हा येईन,’ ‘मी पुन्हा येईन,’ असं म्हणून बसलेल्या फडणवीसांनी अजितदादांना हाताशी धरून एक डाव खेळून पाहिला. पण, तो डाव त्यांच्या अंगलट आला. अखेर कायम ‘सावध’ भूमिकेत असणाऱ्या शरद पवारांनी आपला ठेवणीतला डाव खेळला. काँग्रेस आणि शिवसेना या विरुद्ध टोकाची विचारधारा असलेल्या दोन पक्षांना सोबत घेऊन ‘न भूतो न भविष्यति’ असा महाविकास आघाडीचा प्रयोग करून दाखवला. झालं… 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 105 जागा कमावून देखील भाजपला सत्ता गमवावी लागली. पुढं वाट्याला काय आलं तर विरोधी बाकांवर जाऊन बसणं! तिकडं महाविकास आघाडीचा उदय झाला आणि इकडं भाजपच्या सत्तास्थापनेच्या स्वप्नाचा अस्त झाला. अखेर 30 जून 2022 ची पहाट उजाडली आणि अडीच वर्षांनी का होईना पण विरोधी बाकांवर हात आपटत बसलेल्या भाजपचा ‘सत्तोदय’ झाला. पण इथंही भाजपच्या वाट्याला सुख कमी आणि दुःखच जास्त आलं. सत्ता मिळाली पण मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली. आता मात्र भाजपला दोन्ही हवंय; सत्ताही हवी आणि मुख्यमंत्रिपदही हवं! “आताची निवडणूक महायुतीतर्फे पण 2029 ची निवडणूक ‘शत प्रतिशत’ भाजप म्हणजे स्वबळावर,” असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित सहाह यांनी पोटातलं ओठांवर आणलंच! नुकत्याच झालेल्या महायुतीच्या बैठकीत,’ आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद देऊन त्याग केला आता जागावाटपात आम्हाला जास्तीच्या जागा सोडून तुम्ही त्याग करा , असा जणू इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला! थोडक्यात काय, तर महायुतीतलं शिंदेंसेनेचं वाढलेलं बळ कमी करण्यासाठी आणि अजितदादांना आहे त्याच परिस्थितीत ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आपली प्रत्येक चाल खेळणार हे नक्की!
…………….
काँग्रेस : जागते रहो!
2019 च्या लोकसभेला निवडून आलेला अवघा एकमेव खासदार आणि पुढं विधानसभेला निवडून आलेले 44 आमदार एवढेच काय ते काँग्रेसच्या नौकेत स्वार होते. पण, तिला हाकण्याची ताकद मात्र कुणातच नव्हती. कारण 2014 पासून उसळी मारणाऱ्या मोदी लाटेत काँग्रेसच्या नौकेच्या शिडातील सगळी हवाच निघून गेली होती. अखेर शरद पवारांनी घडवून आणलेल्या ‘आघाडी’च्या प्रयोगामुळं थोडी फार का होईना काँग्रेसमध्ये ‘जान’ आली आणि निदान अडीच वर्षे तरी सत्तेची फळं चाखायला मिळाली. 2024 च्या लोकसभा निवडणूक निकालानंतर मात्र काँग्रेसच्या नौकेची शीड कमालीचा फुगली. मोदी लाटेत किनाऱ्याच्या वाळूत रूतून बसलेल्या काँग्रेसच्या नौकेच्या शिडात 2024 च्या लोकसभा निवडणूक निकालानं अशी काही हवा भरली की, काँग्रेसची नौका सर्वांच्या मागून सर्वांच्या पुढं गेली. bशिडात हवा भरली जाताच काँग्रेसच्या डोक्यातही ‘हवा’ शिरली… आघाडीतील घटक पक्षांना,’ इतक्याच जागा हव्यात, तितक्याच जागा हव्यात;’ अशी दरडावून बोलू लागली. पण, तेवढ्यात हरयाणाचा निकाल लागला आणि काँग्रेसचं ‘तारे जमीं पर’ झालं. एका अर्थानं ते काँग्रेससाठी बरंच झालं. वेळीच स्वतःला सावरता आलं. आता मात्र काँग्रेसला कळून चुकलंय की, जे सोडून गेले ते गेले; त्यांच्या जाण्याचं दुःख करत बसण्यापेक्षा जे सोबत आहेत त्यांना आणि घटक पक्षांना बरोबर घेऊन आपली वाटचाल सुरू ठेवणं यातच आपलं भलं आहे. आधी निवडणूक एकमुखानं लढू मग मुख्यमंत्रिपदाचं पाहू, गटबाजी होऊ नये याकरिता जागरूक राहू, हे ‘जागते रहो’ चं धोरण काँग्रेस पुढील काळात अंगीकारताना दिसेल.
…………
शिंदेंसेना : सेफ गेम, अचूक नेम!
20 जून 2022 चं बंड झालं आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना जन्माला आली. या बंडापुढं ‘आघाडी’ गारद झाली आणि अवघ्या दहा दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. ज्या पक्षात घडून, मोठं होऊन ते बाहेर पडले त्याच पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हावर दावा ठोकून ‘येनं केनं प्रकारे’नं त्यांनी दोन्ही गोष्टी आपल्याशा करून घेतल्या. दरम्यानच्या काळात, राज्याचा गाडा हाकायला त्यांनी अशी काही सुरुवात केली की, सुरुवातीला फडणवीसांचं बोट धरून सरकार चालवणारा मुख्यमंत्री अशी जनमानसांत तयार होऊ पाहाणारी प्रतिमा पुसून काढत ‘सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा निर्माण केली. निर्णयांचा धडाका आणि विकासकामांचा वेग कायम ठेवून CM नव्हे ‘Common Man’ अशी ओळख रुजवली. या शिंदेसेनेचं लोकसभेला काय होणार असा प्रश्न पडलेल्यांना निवडणूक निकालानंतर तोंडात बोटं घालायला लावली. पक्षाच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत 15 जागा पदरात पाडून घेत त्यातल्या 07 जागा जिंकूनही दाखवल्या. बंडात सोबत राहिलेले 38 आमदार ‘आयाराम-गयाराम’च्या लाटेत आजही शिंदेंसोबत
आहेत हे त्यांच्या कुशल नेतृत्वाचं यश म्हणावं लागेल. तसं पाहायला गेलं, तर लोकसभेला महायुतीतील इतर घटक पक्षांना जितका फटका बसला त्या मानानं शिंदेंसेनाला तो तितकासा बसला नसल्याचं वरकरणी तरी दिसून येतं. राज्यात आरक्षणावरून विविध जातींमध्ये वाढलेल्या संघर्षकाळातही त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शाबूत ठेवली. एखाद्या समाजाच्या बाजूनं न झुकता किंवा एखाद्या समाजाच्या विरोधात न जाता ‘देणार म्हणजे देणार’ या आश्वासनाच्या जोरावर वेळ मारून नेली. येत्या निवडणुकीचा विचार करता आतापर्यंत ‘सेफ गेम’ खेळलेले एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात घालण्यास इच्छुक असतीलच पण त्याकरिता जास्तीच्या जागा पदरात पाडून घेत त्या जिंकून आणण्यासाठी आपल्याकडील बाणाचा कुणावर तरी अचूक नेम धरतील!
……….
ठाकरेसेना : ‘सहानुभूती’ची मशाल!
2019 च्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष म्हणून 56 जागा जिंकल्या पण सरकारमध्ये सामील व्हावं लागलं ते आघाडीच्या टेकूवर! पुढं कोरोनाकाळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम लोक आजही विसरलेले नाहीत. अर्थात, या पाच वर्षांत सर्वांत जास्त संघर्ष करावा लागला तो ठाकरेंच्या शिवसेनेलाच! आधी मित्र पक्षाची साथ सुटली, युती तुटली, मग पक्षात बंड झालं, नंतर माणसं सोडून गेली, पुढं सरकारही गेलं आणि मुख्यमंत्रिपदही गेलं. नंतरच्या काळात पक्षाचं नावही गेलं आणि पक्षचिन्हही गेलं. अशा परिस्थितीत पक्षाची नव्यानं बांधणी सुरू होत नाही तोच लोकसभा निवडणूक लागली. आघाडीच्या जागावाटपात सर्वांत जास्त जागा पदरात पाडून घेतल्या पण त्या जिंकून आणण्यात म्हणावं तितकं यश आलं नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडं कोण आहेत तर 09 खासदार आणि 15 आमदार! आता ते 15 वरून 60-70 किंवा त्यापेक्षा जास्त कसे होतील हेच ठाकरेसेनेचं लक्ष्य असेल. निवडणुकीचं बिगुल वाजत असतानाच पुन्हा एकदा बळावलेलं उद्धव ठाकरेंचं आजारपण पक्षाला परवडणारं नाही. ते आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुन्हा एकदा ‘कम बॅक’ करतीलही; पण
ठाकरेसेनेकडून पुन्हा एकदा ‘सहानुभूती’ची मशाल पेटवली जाईल!
…………
दादांची राष्ट्रवादी : ‘नॉट रीचेबल’ नव्हे ‘रीचेबल!’
2019 च्या निवडणूक निकालानंतर फडणवीस आणि अजितदादा यांनी सरकार स्थापन करून सर्वांत पहिला राजकीय धक्का दिला. या दोघांनी मिळून स्थापन केलेल्या सरकारच्या खुशीचे खाल्लेले पेढे कार्यकर्त्यांच्या तोंडात विरघळत नाहीत तोच दादांच्या खंद्या समर्थक आमदारांनी त्यांची साथ सोडली आणि
फडणवीस-अजितदादांचं हे पहिलं सरकार अल्पजीवी ठरलं. फडणवीस आणि दादा औट घटकेचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ठरले. सेना माघारी फिरताच सेनापतीही तंबूत परतला आणि महाराष्ट्रात दुसऱ्या सरकारचा प्रयोग अवतरला. ‘शाम का भूला सुबह घर आया तो उसे भूला नहीं केहते,’ असं म्हणत शरद पवारांनी दादांचं पक्षातील सेनापतिपद कायम ठेवत त्यांना आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्रिदाच्या खुर्चीतही नेऊन बसवलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. सारं काही आलबेल सुरू असतानाच कोरोना प्रगटला आणि सत्ता उपभोगण्याऐवजी कोरोना घालवण्यातच सरकारची सारी ताकद खर्ची पडली. पुढं त्याचा जोर ओसरतो न ओसरतो तोच शिवसेनेतील बंडानं सरकारवर तोफ डागली. सरकारमध्ये नगरविकासमंत्री असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी बंडाचं निशाण फडकावलं आणि आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेत त्यांना मुंबई ते गुवाहाटी व्हाया सुरत असं पर्यटन घडवून आणलं. या काळात गद्दार, खोके एकदम ओके, अशी एक नवी ‘पॉलिटिकल डिक्शनरी’ महाराष्ट्राच्या जनतेला मोफत उपलब्ध करून देण्यात आली. अखेर हे बंडाचं वादळ थेट मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला जाऊन धडकलं. या वादळाचा तडाखा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला असा काही बसला की आघाडी सरकारचा कार्यक्रमच आटोपला. आपल्याला मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं याचं दुःख जितकं उद्धव ठाकरेंना झालं तितकंच किंबहुना त्याहून अधिक दुःख अजितदादांना झालं. कारण दादांना दोन-अडीच वर्षांत एकदा नव्हे तर दोनदा उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून उठावं लागलं. दादा पुन्हा अस्वस्थ झाले आणि एकसारखे ‘नॉट रीचेबल’ व्हायला लागले… तोवर तिकडं रिकाम्या झालेल्या खुर्च्या पुन्हा भरून निघाल्या. ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत एकनाथ शिंदे तर दादांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत देवेंद्र फडणवीस जाऊन बसले. दादांचं ‘नॉट रीचेबल’ होणं म्हणजे राज्याच्या राजकारणात पुन्हा एक भूकंप, हे नवं समीकरण तोपर्यंत ‘सेट’ झालं होतं. पुढं जाऊन अगदी तसंच घडलं. दादा, पुन्हा एकदा ‘नॉट रीचेबल’ झाले आणि थेट राजभवनात प्रगटले. 30 जून 2023 रोजी दादांनी पुन्हा बंड केलं आणि ते त्यांच्या दृष्टीनं यशस्वी देखील झालं. राष्ट्रवादीच्या 54 पैकी 41आमदारांची पलटण दादांनी आपल्या बाजूनं वळवली आणि युती सरकारमध्ये सामील होऊन तिला महायुती बनवली. दादा महायुतीत सामील होताच त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्रिपदाची नवी कोरी खुर्ची सजवण्यात आली आणि दादांनी त्या खुर्चीत बसून उपमुख्यमंत्रिपदाची सलग हॅटट्रिक साधली. दादांनी पक्षाचं नाव, पक्षचिन्ह, माणसं सर्व काही मिळवलं खरं पण पुतण्यानं काकांची साथ सोडून त्यांची माणसं पळवली आणि पक्ष ‘टेकओव्हर’ केला ही गोष्ट दादांच्या विरोधात गेली. अखेर लोकसभा निवडणुकीत त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. ‘बारामतीत बहिणीविरुद्ध पत्नीला उभं करणं ही माझी चूक होती,’ हे दादांनी मान्यही केलं पण तोवर वेळ निघून गेली होती. आता स्वतःला सिद्ध करणं हाच दादांपुढं एकमेव पर्याय आहे आणि ‘हीच ती वेळ’ आहे. अंगावरील ‘गुलाबी’ जॅकेटची ‘जादू’ आणि लाडक्या बहिणींचे आशीर्वाद लाभल्यास दादा ‘कम बॅक’ करू शकतात. त्यामुळं महायुतीत असूनही महायुतीला असून नसल्यासारखे वाटणारे दादा आता सवयीप्रमाणं ‘नॉट रीचेबल’ होतील, असं वाटत नाही. उलट आपण ‘रीचेबल’ कसं राहू यावरच ते भर देतील आणि आपल्या पक्षाचं हित जपतील.
……….
साहेबांची राष्ट्रवादी : पक्ष नव्हे, ‘फिनिक्स’ पक्षी!
ते म्हणतात ना, ‘घर फिरलं की घराचे वासे फिरतात,’ असं काहीसं शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या बाबतीत घडलं. आधी घरातला माणूस फुटला, मग कुटुंब म्हणून सांभाळ केलेल्या पक्षातली माणसं फुटली. एकेक करत अनेक जण सोडून गेली… तोवर तिकडं पुतण्यानं पक्षही हिसकावून घेतला आणि पक्षचिन्हही! खरं तर या काळात साहेबांच्या घड्याळातली ‘वेळ’च गंडली! पण 84 वर्षांचा हा तरुण हार मानायला तयार नव्हता! लोकसभा लागली आणि आणि विशीतल्या तरुणालाही लाजवेल, अशी झोकात पावलं टाकत या ऐंशीपार तरुणानं महाराष्ट्राची गल्लो न गल्ली पिंजून काढली. 10 जागा लढून त्यातील 08 जिंकून दाखवल्या आणि अजून मी म्हातारा झालेलो नाही, मला हलक्यात कुणी घेऊ नका, हे पुन्हा एकवार सिद्ध करून दाखवलं. ज्या बारामतीतून ते स्वतः 05 वेळा आणि सुप्रिया सुळे 03 वेळा निवडून आल्या त्या मतदारसंघात त्यांच्याच सूनबाई त्यांच्या मुलीविरुद्ध उभ्या राहिल्या. आव्हान तगडं होतं पण पवारांना बारामती नवीन नव्हती. नात्याच्या खिंडीत सापडलेल्या सुप्रिया सुळेंनी अखेर बारामतीची खिंड लढवली आणि बाजीही मारली. आता विधानसभा लढवण्यासाठी शरद पवार आणि त्यांचा पक्ष पुन्हा एकदा सज्ज झालाय. लोकसभा निवडणूक निकालानंतर साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाची अशी काही ‘क्रेझ’ निर्माण झाली की, आज ज्याला त्याला साहेबांच्या पक्षाकडून लढायचंय आणि तुतारी फुंकून निवडून यायचंय! ज्या पुतण्यानं पक्षविरोधी बंड करून आपला पक्ष हिरावून घेतला त्याला विधानसभेत धडा शिकवणं हे एकमेव उद्दिष्ट पवार साहेबांचं असेल आणि असं घडलंच तर शरद पवार आणि त्यांचा पक्ष म्हणजे पक्ष नसून राखेतून भरारी घेणारा ‘फिनिक्स’ पक्षी ठरेल!
……………
मनसे : नको ‘इधर – उधर’ आता स्वबळावर!
2006 झाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 2009 च्या पहिल्याच निवडणुकीत 13 आमदार विधानसभेत पाठवले आणि राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र आम्ही घडवणारच, असा पुकारा दिला. पण, त्यानंतर मनसेच्या इंजिनाचे डबे एकेक करून रुळावरून घसरू लागले आणि एखाद -दुसरा डबा सोडल्यास उरलेलं इंजिन यार्डात जाऊन पडलं. ‘मोटारमन’च्या भूमिकेत असलेले राज ठाकरे आपलं इंजिन कधी युती तर कधी आघाडी यांच्या सभोवती फिरवत बसले आणि इंजिनाच्या मागचे डबे मागच्या मागं निसटत राहिले. गुजरात फिरून आल्यानंतर राज ठाकरेंनी 2014 ला मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून ‘कॅम्पेन’ चालवलं तर 2019 ला अगदी उलट म्हणजे मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करणारे ‘लाव रे तो व्हिडिओ’ लावत राहिले. 2009 ला 13, 2014 ला 01 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही 01 असा परफॉर्मन्स देणारी मनसे ‘कभी इधर, कभी उधर’च्या नादात आपलं मूळ हरवून बसली. आधीमधी टोल, मशिदींवरील भोंगे अशी आंदोलनं करून आपलं हरवलेलं मूळ शोधू लागली पण ते काही गवसलं नाही. 2024 ची लोकसभा लागली आणि पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर करून आपलं इंजिन रूळावर आणण्याची केविलवाणी धडपड झाली. आता मात्र ‘नो इधर नो उधर’ ही भूमिका घेतलेले राज ठाकरे स्वबळावर विधानसभा लढणार आहेत. खरं तर हा निर्णय त्यांनी खूप आधी घ्यायला हवा होता पण ठीक आहे, ‘देर आए दुरुस्त आए… यानिमित्तानं का होईना त्यांचं यार्डातलं इंजिन पुन्हा एकदा रूळावर येईल, त्याला डबे जोडले जातील आणि राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र मनसैनिकांकडून घडवला जाईल!
संदीप चव्हाण, वृत्तसंपादक, ‘TOP NEWS मराठी’