पुणे- औंध-परिहार चौक, नागरस रोड, डीपी रोड, औंध – सांगवी जोडणारा राजीव गांधी पुल या परिसरात भाले चौक येथे दररोज आणि प्रामुख्याने सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असून या भागात असणारे शॉपिंग मॉल, आय.टी कंपन्या, दुकाने, स्थानिक रहिवासी यांच्यासाठी हा प्रश्न जटील होत आहे. यासाठी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक असल्याचं मत भाजपा पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी व्यक्त केलं आहे.
याबाबत माने यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे तसेच पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे मुख्य अभियंता व्हि.जी.कुलकर्णी यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
या बाबत बोलताना माने म्हणाले की, या भागातील स्थानिक नागरिकांना आणि परिसरात विविध कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी आपण तातडीने उपाय योजना कराव्यात त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करणे, बैठक करणे, आणि सूचना घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
या उपाययोजना त्वरित कराव्यात, रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी सिंगापूर प्रमाणे बिल्डींगमधील रिकाम्या जागांचा उपयोग करता येईल का ? काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक करता येईल का ? लोकांची वाहने दूर अंतरावर पार्क करून त्यांना इलेक्ट्रिक बस व अन्य साधनांनी त्यांच्या इच्छित स्थळी नेता येईल का ? या उपायांचा विचार करता येईल काय हे पाहावे, त्याचबरोबर या परिसरात प्रामुख्याने संध्याकाळ ते रात्रीपर्यंत अतिरिक्त वाहतूक पोलीस व वॉर्डन नियुक्त करावे, स्थानिक नागरिक व या भागात येणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने यावर उपाय योजना करावी.