
राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापल आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षाने आपला दबदबा राखण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. यामध्ये सेलिब्रिटींनीही सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामध्ये अभिनेता प्रसाद ओकने महायुतीच्या सरकारसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेता प्रसाद ओक ‘धर्मवीर’ सिनेमामध्ये शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारून चर्चेत आला होता. सिनेमाच्या पहिल्या भागाच्या रिलीजनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यामुळे या सिनेमाचं राजकीय कनेक्शन देखील चर्चेत आलं होतं.
प्रसाद ओक – ‘महायुती आहे तर टेन्शनच नाही’
आता प्रसाद ओकने महायुतीच्या सरकारसाठी एक व्हिडीओ तयार केला आहे, ज्यामध्ये तो म्हणतो, ‘महायुती सरकार आहे तर टेन्शनच नाही!’ व्हिडीओमध्ये प्रसाद एका फोन कॉलवर बोलताना दिसतो. तो म्हणतो, ‘शुटिंग संपली, निघालोय, लवकर पोचतो.’ त्यावर एक व्यक्ती त्याला विचारते, ‘तुम्ही निघालात, पण कार घेऊन आलात का?’ त्यावर प्रसाद उत्तरतो, ‘अरे, काही टेन्शन नाही रे! महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं सुलभ झालंय की कुठूनही कुठेही जाता येतं!’
प्रसाद पुढे म्हणताना दिसतो, ‘माझ्या मुंबईत येऊन 25-26 वर्ष झाली, पण गेल्या 7 वर्षांत जे महाराष्ट्रात बदल झालेत, ते काहीतरी वेगळंय. महायुतीच्या सरकारच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र मोठा होतोय. गावागावांत हायवे पोहचलेत, कृषी योजनेत सुधारणा झाल्यात, आणि महिला सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहिण योजना’ सारख्या योजनाही सुरू झाल्यात.’
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रसाद ओकचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. प्रसाद ओकच्या या व्हिडीओमुळे सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.