अंतराळ क्षेत्रात भारताने नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. यामध्ये एक स्वदेशी आणि सिंगापूरच्या सहा उपग्रहांचा समावेश आहे. हे उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून PSLV-C56 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. सिंगापूरने पृथ्वीचे निरीक्षण करणारे उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी इस्रोची मदत घेतली. त्यासाठी इस्रोच्या PSLV-C56 रॉकेटद्वारे सिंगापूरच्या 6 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. आज सकाळी 6.30 वाजता या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले.
वर्षातली तिसरी व्यावसायिक मोहिम
भारतीय अंतराळ संस्थेची या वर्षातील ही तिसरी व्यावसायिक मोहीम आहे. इस्रोने यापूर्वी मार्चमध्ये LVM-3 रॉकेटसह ब्रिटनच्या वन-वेव्ह (ONE-WAVE) शी संबंधित 36 उपग्रह प्रक्षेपित केले होते. यानंतर एप्रिलमध्ये पीएसएलव्ही रॉकेटमधून सिंगापूरचे 2 उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले होते. या उपग्रहाचे प्रक्षेपण झाल्यानंतर हा उपग्रह आता सिंगापूरच्या विविध संस्थांच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहे.
चांद्रयान – 3 चे यशस्वी प्रक्षेपण
भारताचे चांद्रयान-3 हे यान शुक्रवार (14 जुलै) रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून चांद्रयान-3 अवकाशात झेपावले आणि देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. भारताची चांद्रयान-तीन ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. चांद्रयान-3 अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे.