लातुर- कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा इथे ही घटना घडली आहे. मृत महिला या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आहेत.
राधाबाई धोंडिबा आडे (45), दीक्षा धोंडिबा आडे (20), काजल धोंडिबा आडे (1, सर्वजण रा. रामापूरतांडा, ता. पालम, जि. परभणी), सुषमा संजय राठोड (21), अरुणा गंगाधर राठोड (25, दोघेही रा. मोजमाबाद तांडा, ता. पालम, जि. परभणी) अशी मृत महिलांची नावे आहेत.
ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्यातील ऊसतोड टोळी पाच महिन्यांपासून अहमदपूर तालुक्यात आहे. येत्या दोन दिवसांत साखर कारखाना बंद होणार असल्याने ऊसतोड महिला शनिवारी सकाळी तुळशीराम तांडा येथील तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुवत असताना अचानकपणे एक मुलगी बुडत असल्याचे दिसू लागल्याने एकापाठोपाठ एकजण अशा चौघींनी वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, पोहता येत नसल्याने या पाच जणीही बुडाल्याने मृत्यू झाला.
आपल्या कुटुंबातील नातेवाईक बुडत असल्याने जवळच असलेल्या 10 वर्षीय मुलाने पाहिले आणि त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेव्हा गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्या पाच जणींचा मृत्यू झाला.