Varathi Jetty Damage : पावसाळ्यात अनेक भागात रस्ता खचल्याच्या किंवा पूल वाहून गेल्याच्या घटना आपण पाहतो. इंद्रायणी नदीवरील पुल दुर्घटना नुकतीच घडून गेली आहे असं असताना आता रायगड जिल्ह्यातील वराठी येथील जेट्टीला तडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना (Varathi Jetty Damage) घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर सावित्री नदीच्या पायथ्याशी वराठी गावात मेरी टाईम बोर्डाकडून जेट्टीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आला आहे. पण हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं दिसत आहे त्यातही सतत पाऊस सुरू असल्यामुळे जेट्टीला पुन्हा एकदा मोठमोठ्या चिरा पडल्या असून जेट्टी पुन्हा सावित्री नदीत वाहून जाणार असल्याचे चित्र आहे.
दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा (Varathi Jetty Damage)
दुरुस्तीच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा तर झाला आहेच शिवाय दुसऱ्यांदा ही जेट्टी शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र समोर आले आहे. मासेमारी करणारे अनेक मच्छीमार या जेट्टीवरून दररोज होडीच्या सहाय्याने ये-जा करत असतात. जर ही जेट्टी पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली तर मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते अपघात होऊ शकतात तरीही ठेकेदार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असं बोललं जातंय. दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदाराने लाखोंचा गंडा घालून फसवणूक केली असल्याचे देखील ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ठेकेदाराने पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली जेटीच्या कामाला चुना लावण्याचे काम केले. अशा ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी आता इथल्या ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.
निकृष्ट दर्जाची दुरुस्ती केल्यामुळे संताप
मेरीटाईम बोर्डाकडून बांधण्यात आलेल्या मराठी जेट्टीला तडा गेल्यामुळे आणि दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदाराकडून केवळ इथल्या तडा गेलेल्या भागाला तात्पुरत्या स्वरूपाची निकृष्ट दर्जाची दुरुस्ती केल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या इथल्या ठेकेदारावर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.