नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मोठा आरोप केला. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज कार दिल्यावर एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटातून संताप व्यक्त केला जात आहे. गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे यांनी गोऱ्हे यांचा चापलूस व गद्दार असा उल्लेख केला आहे.“नीलम गोऱ्हे ३० वर्षे ज्या पक्षात राहिल्या तिथे असं काही होत असेल तर नीलम गोऱ्हे यांनी एवढा पैसा कुठे ठेवला आहे? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कारण ‘मातोश्री’वर त्यांच्याइतकं दुसरा कोणताही माणूस वावरत नव्हता. त्या मातोश्रीवरच असायच्या. त्यांनी कुठे-कुठे संपत्ती घेतली? परदेशात किती पैसे गुंतवले? या प्रश्नांची उत्तरं नीलम गोऱ्हे यांनी द्यायला हवीत. दरम्यान आता त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि अपार कष्टातून उभा राहिलेला शिवसेना हा पक्ष गोरगरिबांसाठी झटणारा आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देणारा पक्ष म्हणून ओळख आहे. “नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने काल अत्यंत बेताल वक्तव्य केले. सत्ताधारी पक्षांना खुश करून राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचे असतील तर त्यांनी ती खुशाल पाडून घ्यावीत. मात्र त्यासाठी सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत अश्लाघ्य आहे. त्यांचे हे बेताल वक्तव्य वंदनीय बाळासाहेब यांनी जोपासलेल्या परंपरेच्या मुळावरचा घाव आहे. महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांनी जीवाचं रान करून जो पक्ष उभा केला त्या पक्षाच्या जीवावर तब्बल चार वेळा आमदारकी भोगणाऱ्या आणि मोबदल्यात एक नगरसेवकच काय साधी पक्षाची एक शाखा आपल्या राहत्या भागात उभी करू न शकणाऱ्या कर्तृत्वशून्य महिलेकडून झालेली चिखलफेक महाराष्ट्र तथा मराठी मनाला दुखावणारी आहेत”. असं म्हणत नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.