पुण्यातील भुशी धरण, ताम्हिनी घाट परिसरात गेल्या महिनाभरात मोठ्या दुर्घटना घडल्या. यामध्ये काही पर्यटकांना प्राण गमवावे लागले. वारंवार पर्यटकांना आवाहन करूनही पर्यटक खबरदारी घेत नसल्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अशा प्रकारच्या पर्यटन स्थळांवर सविस्तर आणि कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. याच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर सध्या कारवाई केली जात आहे.
लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात असलेल्या लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, घुबड तलाव आणि सहारा पुलाच्या पुढे असणाऱ्या धबधब्यांवरील डोंगरकड्यावर तसेच भुशी धरण येथील निर्जन ठिकाणी, धोकादायक धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली. मात्र असे असूनही प्रशासनाची नियमावली धाब्यावर बसून अनेक पर्यटक सर्रासपणे धोकादायक डोंगरकड्यांवर जाऊन, मोठ्या प्रवाहांच्या धबधब्यात जाऊन आपला जीव धोक्यात घालताना आढळून येत आहेत. ठिकठिकाणी पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे तरी देखील असे प्रकार घडत असल्याने आतापर्यंत 48 पर्यटकांवर वनविभाग आणि लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
अतिउत्साही पर्यटकांवर थेट कारवाई
लोणावळ्यातील काही पॉईंट्स, डोंगर कडे, धरणाचा निर्जन भाग अशा ठिकाणी जायला पर्यटकांना बंदी असून काही पर्यटन स्थळांवर सायंकाळी 6 नंतर जायला पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी काढले आहेत. पोलिस आणि वनखात्याकडून ठिकठिकाणी फलक लावून आणि लाऊड स्पीकर वरून सुद्धा तशा प्रकारच्या सूचना पर्यटकांना देण्यात येत आहेत. मात्र तरीही पर्यटक आपला जीव धोक्यात घालून मनाई करण्यात आलेल्या ठिकाणांवर जात आहेत. अशा पर्यटकांवर थेट कारवाई करण्याचे पाऊल पोलीस प्रशासन आणि वनखात्याने उचलले असून भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे या पर्यटकांवर कारवाई केली जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत 48 पर्यटकांवर कारवाई करण्यात आली आहे.