मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे गटासाठी महत्त्वाचा दिवस आहे.
सत्तासंघर्षाची सुनावणी विस्तारित पीठाकडे की, घटनापीठाकडे जाणार? किंवा निवडणूक आयोगाच्या नोटिशीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या सुनावणीत मिळणार आहेत. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला होता. दोन्ही बाजूंना 27 जुलैपर्यंत आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालय आज करणार आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्यांची बैठक बोलावली असून आज दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान ही बैठक होणार असून नेमकं या बैठकीत काय ठरणार याची उत्सुकता आहे.
दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर ही बैठक होत आहे. राऊत यांच्या अटकेनंतर पक्षाची भूमिका कोण मांडणार याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेनेची भूमिका संजय राऊत हे परखड आणि रोखठोक मांडत होते. ते मुख्य प्रवक्ते होते. त्यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेनेपुढे आता एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवसेनेची भक्कम बाजू मांडण्यासाठी आता मुख्य प्रवक्त्याची निवड होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल