मुंबई : वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी ५ ते ५० कोटी रुपयांपर्यंतची ऑफर मला देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा बीडचे निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून केला आहे.
एन्काऊंटर करण्याचा माझ्यात दम होता, म्हणून त्यांनी सायबरमधून मला तिकडे बोलवून घेतले होते. मी काही माझा मोठेपणा सांगत नाही, असे कासले यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ बीडला घाबरतात. त्यामुळे ते तिकडे येत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिथे सभा झाली, पण फडणवीस आले नाहीत. पोलिस अधिकारी म्हणून मला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची लाज वाटते, असे विधान त्यांनी केले.
गेल्या १० वर्षात फडणवीस यांनी काय केले, असा सवाल करतानाच त्यांची पत्नी पोलिसांच्या पैशावर आपला खर्च भागवत असल्याचा आरोप कासले यांनी केला आहे.
कसा होतो, एन्काऊंटर?
ते म्हणाले की, एन्काऊंटर करण्यापूर्वी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिवांची एक गुप्त बैठक होते. या बैठकीत ठरवले जाते की प्रकरणामध्ये काय करायचे. मग एक ५ ते ६ विश्वासू लोकांची टीम तयार केली जाते. ते ठरलेल्या ठिकाणी जातात. या टीमला ५ ते ५० कोटींची ऑफर दिली जाते, असा दावा त्यांनी केला. आमचे सरकार आहे, तुम्हाला पुन्हा नोकरीत घेतले जााईल, चौकशीतून तुम्हाला बाहेर काढू, असे आश्वासन दिले जाते, असेही त्यांनी म्हटले.
अक्षय शिंदे प्रकरणात ५ पोलिसांवर गुन्हे दाखल करून एसआयटी बसवली. पण त्याचा काही उपयोग होणार नाही. केंद्राची एसआयटी बसवली, तरच सत्य समोर येईल, असेही कासले यांनी म्हटले. अक्षय शिंदेचे हातपाय बांधलेले होते. तो बोगस एन्काऊंटर होता, असा आरोप त्यांनी केला. सरकार आणि विरोधक नंपुसक आहेत. अक्षय शिंदेप्रकरणी आरोपी करायचे असेल तर ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले पाहिजे, असे विधानही कासले यांनी केले.