सरपंच संतोष देशमुख हत्या (santosh deshmukh case) प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले (sudarshan ghule), सुधीर सांगळे (sudhir sangle) आणि कृष्णा आंधळे (krushna andhale) हे लपण्यासाठी चक्क परराज्यात गेले होते. व आपल्याला कोणीही ओळखू नये यासाठी त्यांनी आपला लुक चेंज केला होता, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.
भिवंडी कनेक्शन
9 डिसेंबर रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अमानुषपणे हत्या करण्यात आली. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघेही एकत्र होते आणि लपण्यासाठी आसरा शोधत होते. त्यासाठी बीड सोडून सर्वप्रथम ते छत्रपती संभाजी नगरला गेले. दरम्यान त्यांनी पुण्यातील भोसरीतून कॅब केली. त्यानंतर 11 डिसेंबरला आसऱ्याच्या शोधात हे तिघेजण भिवंडीला पोहोचले. भिवंडीत मूळचे बीडचे असलेले विजय डोईफोडे यांचं हॉटेल आहे. तिथेच राहण्याच्या ते विचारात होते. तत्पूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि समाज कल्याण न्यासाच्या सोन्या पाटील यांच्याकडे जायचं ठरवलं. कार्यालयात पोहोचल्यानंतर सोन्या पाटील नसल्याने त्यांचे बंधू जयवंत पाटील यांना ते भेटले. पाटील यांच्याकडे डोईफोडे यांच्या बद्दल विचारणा केली. त्यावर ते बाहेरगावी गेल्याचं कळालं. त्यामुळे पाटील यांच्याकडून डोईफोडे यांच्या बियर शॉप आणि हॉटेलचा पत्ता घेऊन या तिघांनी वळपाडा भागातील हॉटेल गाठलं. आणि हॉटेल मधील कामगाराने दाखवलेल्या हुशारीमुळे या तिघांचा प्लॅन फसला.
हॉटेल मालक विजय डोईफोडे यांच्याशी चांगले संबंध असल्याने ते आपल्याला आसरा देतील अशी अपेक्षा सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना होती. मात्र तसं झालं नाही. डोईफोडे यांच्या हॉटेलमधील कामगाराने या तिघांपैकी एकाचा फोटो काढून डोईफोडे यांना पाठवला. हे तिघेही हत्या करून इथे आल्याचं सांगितलं. त्यानंतर अर्धा तासाने या तिघांसमोरच डोईफोडे यांना फोन केला. गावाकडचे तीन जण राहण्याची व्यवस्था होईल का, असं विचारत असल्याचं सांगितलं. मात्र डोईफोडेंनी थेट नकार दिला. त्यामुळे लघवीला जाऊन येतो असं सांगून हे तिघेही हॉटेलमधून बाहेर पडले आणि पसार झाले.
गुजरात कनेक्शन
हे तिघेही या हॉटेलमधून पसार होईपर्यंतच्या काळात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू झाली. आरोपींचे फोटो व्हायरल झाले. सगळीकडे बातम्या चालू लागल्या त्यामुळे भिवंडी मधून दुसरीकडे पोहोचणं सहज शक्य होणार नाही हे या तिघांनाही माहीत होतं. पोलिसांची पथकं या तिघांच्याही मागावर होती. त्यामुळे पोलिसांना चकवा देण्यासाठी सुदर्शन घुलेने मिशी कापली. आरोपींनी फोटोत असलेल्या लुक पेक्षा वेगळा लुक केला. आणि राज्यात कुठेही गेलो तरी पकडले जाऊ या भीतीने सुदर्शनने प्लॅन केला तो राज्य सोडून जाण्याचा.. आणि पुढच्या दोन दिवसात या तिघांनी थेट गुजरात गाठलं. त्यानंतरचे पंधरा दिवस आरोपींनी गुजरात मधील गिरनार मंदिरात आसरा घेतला.
गिरनार मंदिरात पंधरा दिवस राहिल्यानंतर या तिघांकडेचे पैसे संपले. मुळेच पैशांची व्यवस्था करण्यासाठी कृष्णा आंधळेला व्यवस्था करण्यासाठी पाठवण्यात आलं. मात्र पैसे आणण्यासाठी गेलेला कृष्णा हा ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी परत आलाच नाही. त्यामुळे अखेर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेने गुजरात सोडून पुणे गाठलं. पुण्यातील बालेवाडीतील एका खोलीत हे दोघं काही दिवस राहिले. मात्र अखेर पोलीस सर्व लिंक लावून या दोघांपर्यंत पोहोचले आणि त्यांना अटकही केली. मात्र पैसे घेण्यासाठी बाहेर पडलेला कृष्णा आंधळे हा त्यानंतर कुठे गेला ? अद्यापही त्याचा कुठलाच ठाव ठिकाणा कसा नाही ? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.