संतोष देशमुख हत्या प्रकरण: तपासात कुचराई केल्याप्रकरणी एसपी बारगळ यांच्या अडचणीत वाढ; तुरुंगवास होणार ?

497 0

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यातील अनेक ठिकाणी पडले. मात्र देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडचे तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने आता बारगळ यांच्यावर कारवाई किंवा तुरुंगवास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बारगळ यांना होणार तुरुंगवास ?

देशमुख यांचं अपहण झालं, त्यावेळी त्यांच्या सुटकेसाठी खासदार सोनवणे यांनी प्रयत्न केले. देशमुख यांना वाचवण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठीच त्यांनी एसपी बारगळ यांना अनेक मेसेज आणि फोन केले. मात्र बारगळ यांनी सोनवणे यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे खासदार सोनवणे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे बारगळ यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. आता या प्रस्तावावर मोठा निर्णय देण्यात आला आहे. त्यानुसार बारगळ यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. गृहमंत्रालयाच्या हक्कभंग आणि नैतिकता विभागाचे उपसचिव यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना 18 डिसेंबरला पत्र पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

कोणती शिक्षा होणार ?

खासदारांच्या विशेष अधिकाराचा भंग किंवा अवमान केल्याबद्दल दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला ताकीद देणे किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय हक्कभंग केल्यामुळे निलंबन किंवा हकालपट्टी देखील होऊ शकते. त्यामुळेच आता अविनाश बारगळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात ते दोषी आढळले, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

Share This News
error: Content is protected !!