पुण्यातील पोर्शे कार अपघाताने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं होतं. दारूचे नशेत असलेल्या अल्पवयीन मुलाने कार चालवत दोघांना चिरडलं होतं. हे प्रकरण अजूनही कोर्टात चालू असताना दुसरीकडे यापेक्षाही भयंकर प्रकरण समोर आलय. गुजरातच्या वडोदरामध्ये (vadodara accident) वीस वर्षे तरुणाने भरधाव वेगात कार चालवत पाच जणांना उडवलं. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत. आणि एवढंच काय तर इतका मोठा अपघात हातून घडल्यानंतरही कारचालक आपण काहीच न केल्यासारखं रस्त्यावर आरडाओरडा करत फिरत होता. या तरुणाला आता ताब्यात घेण्यात आलं आहे.
रक्षित चौरसिया (rakshit chaursia) असं या तरुणाचं नाव असून तो केवळ वीस वर्षांचा आहे. तो गुरुवारी रात्री उशिरा 12.30 वाजता एका मित्रासोबत त्याच्या कार मधून वडोदरा शहराच्या करेलीबाग येथे वर्दळीच्या ठिकाणी फिरत होता. त्यावेळी हा अपघात झाला. 100 पेक्षा जास्त वेगात असलेल्या या कारने दोन दुचाकींना धडक दिली. तसंच बाजूला उभ्या असलेल्या नागरिकांनाही उडवलं. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही महिला आपल्या अल्पवयीन मुली बरोबर होळीचे रंग खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती. मात्र या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान अपघात झाल्याचे पाहताच अनेकांनी आपल्या फोनमध्ये व्हिडिओ चालू केला. त्यावेळी कारचालकाचा मित्र असलेला मुलगा खाली उतरून ‘मी काही केलं नाही तो गाडी चालवतोय’, असं म्हणाला. त्यानंतर गाडीतून रक्षित चौरसिया खाली उतरला. तो प्रचंड नशेत दिसत होता. त्याच्या हातून इतका मोठा अपघात घडलेला असूनही तो वारंवार, ‘आणखी एक राऊंड हवा आहे का?’, ‘ओम नम; शिवाय’ असं ओरडत होता. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारचालकाला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
रक्षित चौरसिया कोण आहे ?
हा अपघात ज्याने केला तो रक्षित चौरसिया हा मूळचा उत्तर प्रदेशच्या वाराणसी मधील रहिवासी आहे. तर वडोदरा येथील एका विद्यापीठात तो कायद्याचं शिक्षण घेत आहे. तर गाडीत त्याच्या बाजूला बसलेल्या त्याच्या मित्राचं नाव मित चौहान असं असून तो वडोदरा येथील रहिवासी आहे. आणि एका खाजगी विद्यापीठात शिक्षण घेतोय. दरम्यान अपघातात वापरलेली गाडी ही मित चौहानची असून त्याच्या कडून रक्षित ने गाडी चालवायला घेतली होती. त्यामुळे त्याच्या हातून हा अपघात झाला. दरम्यान या दोन्ही आरोपींना मध्यरात्रीचे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटकही केली आहे.
आरोपीचं म्हणणं काय ?
प्रथमदर्शी हे दोन्ही तरुण मद्यधुंद अवस्थेत दिसून येत होते. त्यामुळेच अटक केल्याबरोबर या दोघांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्याचे रिपोर्ट लवकरच समोर येतील. मात्र अपघात ज्याच्याकडून झाला तो रक्षित चौरसिया मात्र आपण मद्य प्राशन केलंच नसल्याचं सांगत आहे. चौरसिया म्हणला, ‘आम्ही दारू प्यायली नाही, तर होळी साजरी केल्यानंतर घऱी परतत होतो. आम्ही ना दारु प्यायला होतो, ना ड्रग्ज घेतले होते. त्यात माझ्या कारचा स्पीड फक्त ताशी 50 किमी होता. रस्त्यावर एक खड्डा होता तो खड्डा चुकवून बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी माझी गाडी समोरून चालणाऱ्या स्कूटरला धडकली. त्यावेळी आपत्कालीन एअरबॅग बाहेर आल्या. ज्यामुळे मला समोरचा दिसलं नाही. माझ्यासमोर फक्त स्कूटर आणि कार दिसत होती. मला रस्त्याच्या शेजारी चालणारे लोक दिसलेच नाहीत.” त्याच्या या म्हणण्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून नेमकं खरं काय हे शोधण्यासाठी पोलिसांना मोठा तपास करावा लागणार आहे.