पुण्यातील प्रसिद्ध गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (gokhale institute) या संस्थेकडून सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीला जवळपास दीड कोटी रुपयांची रक्कम वळवल्याच्या आरोपाखाली मिलिंद देशमुख हे सध्या अटकेत आहेत. मात्र दीड कोटींच्या अपहाराचं हे नेमकं प्रकरण काय आहे ? देशमुख यांच्या विरोधातील तक्रारीत नेमकं काय म्हणलंय ? हे सविस्तर जाणून घेऊया.
नेमकं प्रकरण काय ?
गोखले इन्स्टिट्यूटचे रिसर्च कोऑर्डिनेटर डॉ. विशाल भीमराव गायकवाड यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात यासंदर्भातली फिर्याद दिली. गोखले इन्स्टिट्यूट सर्व्हंट्स ऑफ इंडियाच्या अधीन आहे. संस्थेला मिळणारं शासकीय अनुदान, विद्यार्थ्यांचं शुल्क आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीवर संस्था चालते. संशयित आरोपी सचिव मिलिंद देशमुख याने 13 डिसेंबर 2022 रोजी संस्थेला पत्र देऊन नागपूर येथील सर्व्हंट्स ऑफ इंडियाची जमीन ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर गोखले अभिमत विद्यापीठाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत त्याला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. 24 फेब्रुवारी 2022 रोजी ही रक्कम मंजूर करण्यात आली. यापैकी एक कोटी दोन लाख रुपये नागपूर जिल्हाधिकार्यांच्या खात्यावर तसेच 40 लाख रुपये धनादेशाद्वारे सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या खात्यावर पाठवण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमावलीनुसार शैक्षणिक संस्थेतील निधी अन्य खात्यात वळवणे नियमबाह्य असतानाही ही रक्कम वळवण्यात आली. या रकमेचा वापर जुनी कागदपत्रे मिळवणे, स्टॅम्प ड्युटी, प्रशासकीय खर्च इत्यादी कारणांनी दाखविण्यात आला. मात्र हा तपशील संशयास्पद असल्याचं, या तक्रारीत म्हणण्यात आलं आहे. त्यामुळेच मिलिंद देशमुख व त्याच्या सहकाऱ्यांनी संस्थेची फसवणूक करत निधीचा अपहार केल्याचा आरोप तक्रारदार डॉ. गायकवाड यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी देशमुखला अटक केली असून न्यायालयाने 11 एप्रिल पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
देशमुखचे इतरही प्रताप
देशमुख याने सोसायटीच्या लेटरहेडचा वापर करून 1.42 कोटी रुपये रक्कम वळवली. त्याबाबत धर्मादाय आयुक्तालयाला कळवलं का ? त्याने या निधीचं काय केलं ? हे पैसे कशासाठी वापरण्यात आले ? या एक कोटी 42 लाखां बरोबरच आणखी रकमेची अफरातफरी झाली आहे का ? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यापूर्वीही याच देशमुखनं कै. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे चॅरिटी ट्रस्टच्या मालकीची मौजे शेवाळवाडीतील जमीनीचा फेरफार करून सातबाऱ्यावर स्वतःच्या नावे नोंद केली, त्याप्रकरणीही डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या देशमुखने कुठे कुठे आर्थिक अफरातफर केली आहे याचा शोध लावणं गरजेचं झालं.