शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून दररोज धक्कादायक घटनासमोर येत आहेत. यातच आता एक व्हिडिओ (pune viral video) सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामध्ये तीन तरुणांनी किरकोळ कारणावरून कार चालकावर (attack on car driver) हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ पाहून माणसात माणुसकी शिल्लक आहे की नाही ? पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था (pune police) आहे की नाही ? अगदी क्षुल्लक कारणांवरून मारहाण करण्या इतकी हिम्मत येते कुठून ? असे प्रश्न निर्माण होत आहेत.
https://x.com/gharkekalesh/status/1878792224399675797
हा व्हिडिओ “घर के कलेश” नावाच्या एका पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टनुसार हा व्हिडिओ 13 जानेवारी चा आहे. या व्हिडिओत एक कार रस्त्याने जात आहे. त्याचवेळी एका रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. कारचं चाक या पाण्यावरून जाताना साहजिक रित्या थोडसं पाणी बाजूला उडालं. हे पाणी काही तरुणांच्या अंगावर उडालं. त्यानंतर मात्र चिडलेल्या या 3 तरुणांनी एक्टिवा गाडीवरून या कारचा पाठलाग केला. त्यानंतर कारला आपली दुचाकी आडवी घालून चालकाला थांबवलं. त्यानंतर त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्याला मारहाण देखील केली. हे सगळं सुरू असताना देखील ‘माझ्याकडून चुकून पाणी उडलं. गाडी खूप हळू चालवत होतो. मी जाणून बुजून काहीही केलेलं नाही’, असं हा कारचालक सांगत होता. मात्र तरीही या तिघांनी त्याचं ऐकून न घेता अगदी किरकोळ कारणावरून वाहन चालकाला मारहाण केली.
मुंढव्यातही पती पत्नीवर हल्ला
मुंढव्यातील (mundhawa police) कार्निवल हॉटेल समोर यापेक्षाही गंभीर घटना नुकतीच घडली होती. कारचालकाने हॉर्न वाजवल्याच्या रागात बाप लेकाने मिळून कार मधील दोन महिलांनी एका पुरुषाला जबर मारहाण केली होती. सर्वप्रथम मुलाने गाडीच्या काचा फोडून गाडीतील पुरुषाला फायटर सारख्या धारदार शस्त्राने मारहाण करायला सुरुवात केली. मात्र त्यानंतर चक्क या मुलाबरोबर असलेल्या त्याच्या वडिलांनी देखील गाडीतील महिलांना आणि पुरुषाला मारहाण केली. यामध्ये हे कुटुंबीय गंभीर जखमी झाले असून त्यांना अनेक दिवस रुग्णालयात उपचार देखील घ्यावे लागले. या प्रकरणी शुभम गायकवाड आणि राजू गायकवाड या बापलेकाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अशाच पद्धतीची ही घटना समोर आली आहे.
वाहन चालकांचे जीव धोक्यात
या दोन्ही घटनांमुळे वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरातील गुन्हेगारीत आणि गुन्हेगारांमध्ये देखील वाढ झाली आहे. पुण्यातील अगदी चौदा- पंधरा वर्षांची मुलं सुद्धा स्वतःला भाई म्हणवून घेत आपापल्या परिसरात राडे करताना दिसत आहेत. एवढेच काय तर अनेकदा या मुलांचे आई-वडील सुद्धा त्यांना थांबवताना दिसत नाहीत. त्यामुळेच किरकोळ कारणावरून थेट मारहाण ते खूनापर्यंतच्या घटना पुण्यात घडत आहेत. दरम्यान या दोन्ही घटनांनंतर वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यांवर सुरक्षा रक्षक तैनात करून अशा आरोपींना कडक शासन करण्याची गरज निर्माण झाली आहे.