संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी घटना उरण शहरात घडली होती. 20 वर्षीय यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची हत्या करून अतिशय छिन्नविच्छिन्न अवस्थेत तिचा मृतदेह विटंबना करून टाकून दिल्याचे आढळून आले होते. यशश्रीची हत्या तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या दाऊद शेख नावाच्या तरुणाने केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. तेव्हापासून पोलीस प्रशासनाकडून युद्ध पातळीवर दाऊदचा शोध सुरू होता आणि आता अखेर आज सकाळीच दाऊदला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
उरण शहरात राहणारी यशश्री शिंदे ही 20 वर्षीय तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच यशश्रीचा मृतदेह काल कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. यशश्री च्या चेहऱ्याचा अक्षरशः चेंदामेंदा करण्यात आला होता. प्रायव्हेट बॉडी पार्ट वर जखमा आढळल्या. त्यामुळे हे प्रकरण समोर येताच नवी मुंबईत संतप्त वातावरण झाले होते. नागरिकांच्या मोठ्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात रोज विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलने करून आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी होत आहे. त्यामुळेच युद्धपातळीवर पोलीस आरोपीचा शोध घेत होते. त्यानंतर आता हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
दाऊद शेख याचा फोन हत्येच्या दिवसापासून बंद होता. त्याचबरोबर त्याचा ठाव ठिकाणा नसल्यामुळे तो राज्यातून फरार झाला असण्याची शक्यता पोलिसांना होती. त्यामुळेच दाऊदला पकडण्यासाठी पोलिसांनी एकूण सहा ते सात पथके तैनात केली होती. ही पथके त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात शोध घेत होती. अनेकांची चौकशी सुरू असताना दाऊदच्या संपर्कातील एका व्यक्तीने दाऊद सध्या कर्नाटकमध्ये असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याचबरोबर तो कर्नाटकहून केरळमध्ये जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नवी मुंबईचे पोलीस पथक थेट कर्नाटकात दाखल झाले. शोध घेतल्यानंतर तो कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथे असल्याचे पोलिसांना समजले आणि तिथूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीला लवकरच नवी मुंबईत आणून न्यायालयीन खटला चालवला जाणार आहे.
पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती
यशश्रीचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला होता. ज्याच्या रिपोर्ट मधून अनेक गोष्टींचा खुलासा होणार होता. आणि आता हे रिपोर्ट पोलिसांच्या हाती आले आहेत. या रिपोर्ट मधून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तिच्या गुप्तांगांवर देखील अनेक जखमा आढळून आल्या. यशश्री च्या मृतदेहाला भटक्या प्राण्यांनी अनेक ठिकाणी चावा घेतल्याचे उघड झाले आहे. भटक्या प्राण्यांनी घेतलेल्या चाव्यामुळेच तिचा चेहरा विद्रूप झाला होता. या प्राण्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडून मास खाल्ले आहे. तर कमरेवर आणि पाठीवर असलेल्या जखमा या चाकूच्या आहेत. त्याचबरोबर यशश्रीवर हत्या करण्याआधी बलात्कार झालेला नाही आणि प्रथमदर्शी ही हत्या एकाच व्यक्तीने केल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे. या संदर्भातला पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.