पुण्यातील स्वारगेट बस अत्याचार (swargate case) प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे (datta gade advocate) याच्या वकिलांच्या सहाय्यकाचं अपहरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. आरोपी दत्ता गाडे याची केस घेतल्यामुळेच हे सगळं झाल्याचा संशय पीडिताकडून व्यक्त केला जात होता. मात्र हे अपहरण नसून अपघात होता, हे आता सिद्ध झालंय. त्यामुळेच वकिलांचा सहाय्यक असलेल्या साहिल डोंगरे (sahil dongre) याने अपहरणाचा बनाव नेमका का रचला? प्रश्न उपस्थित होत आहे
साहिल डोंगरे हा तरुण दत्ता गाडे याच्या वकिलांचा सहाय्यक आहे. तो अनेकदा वकिलांच्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांच्या बाजूला उभा असलेला दिसून येतो. याच साहिल डोंगरे याने पंधरा-वीस जणांच्या टोळक्याने आपल्याला मारहाण करून अपहरण केलं व गाडीत बसून आपल्याला दिवे घाटात सोडून दिलं, असा दावा केला. कपडे अस्ताव्यस्त आणि शरीरावर जखमा असलेला डोंगरे याचा फोटो सगळीकडे व्हायरल झाला. एवढेच काय तर वकील वाजिद खान यांनी स्वतः डोंगरे बरोबर काय घडलं हे सांगतानाचा डोंगरे चा हॉस्पिटल मधला व्हिडिओ पोस्ट केला. त्यामुळे सगळ्यांनाच हे प्रकरण खरं वाटलं. मात्र जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा भलतच समोर आलं. साहिल डोंगरे याने अनिकेत मस्के सोबत सागर बार येथे मध्यरात्रीपर्यंत दारू प्यायली. या बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही तो आणि त्याचा मित्र कैद झाला. त्यानंतर दिवे घाटातून येत असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डोंगरे याचा अपघात झाला. त्यात त्याला दुखापत झाली. तो त्याच ठिकाणी बेशुद्ध पडला. दिवे घाटात एक जण अपघात होऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्याचा फोनही पोलीस कंट्रोल रूमला आला होता. इतकचं नाही तर डोंगरे याने स्वतः 108 नंबर वर फोन करून आपला अपघात झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्याला घ्यायला ॲम्बुलन्स ही आली आणि त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर त्याने आपला अपघात झाला नसून अपहरण झालं होतं असा दावा केला. पोलीस तपासातून त्याचा हा दावा खोटा ठरवणारे अनेक पुरावे हाती आले. मात्र त्याने हा बनाव का रचला ? आणि स्वतः वकील असलेल्या वाजिद खान यांनी कुठलीही पडताळणी न करता सहाय्यकाच्या या दाव्यावर विश्वास कसा काय ठेवला हे प्रश्न उपस्थित होत आहेत.
लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
स्वारगेट अत्याचार प्रकरणात आधीच आरोपीच्या एका वकिलाने हे अत्याचार नसून संगणमताने झालेले संबंध होते. त्यासाठी पीडित तरुणीला आरोपी दत्ता गाडे हा साडेसात हजार रुपये देणार होता. असा खळबळ जनक दावा केला. त्यानंतर हा दावा खोटा असल्याचं उघड झालं. त्यानंतर आता दुसऱ्या वकिलांच्या सहाय्यकाने अपहरण झाल्याचा दावा केला. त्यामुळे हे खोटे दावे जाणून बुजून पोलीस व माध्यमांचं लक्ष मूळ प्रकरणावरून विचलित करण्यासाठी केले जात आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे साहिल डोंगरे हा माझा वकिलीशी निगडित सहाय्यक नसून केवळ लहान मोठी काम करण्यासाठी मी त्याला नोकरीवर ठेवलंय, असा खुलासा वाजिद खान यांनी केलाय. त्यामुळे साहिल डोंगरे यांनी हा बनाव का रचला की आणखी कुणाच्या सांगण्यावरून रचला याचा तपास करणे गरजेचे आहे.