माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सिद्दिकी यांच्या मारेकर्यांचा आणि सूत्रधारांचा तपास सुरू आहे. यातच आता सिद्दीकींवर गोळ्या झाडणारा मुख्य शूटर शिवकुमार गौतम याला त्याच्या चार साथीदारांसह उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
शिवकुमार गौतमला उत्तर प्रदेशातील बेहराईच जिल्ह्यातुन अटक करण्यात आली आहे. त्याबरोबरच अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, अखिलेश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंग या चौघांना गौतमला फरार असताना मदत केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या अटकेसाठी पोलिसांची 21 दिवसांपासून मोहीम सुरू होती. आरोपींच्या आजूबाजूच्या 45 संशयीतांवर पोलीस 24 तास लक्ष ठेवून होते. या मोहिमेमुळेच अखेर शिवकुमार गौतमला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
शिवकुमार गौतम हा पुण्यात असताना त्याची शुभम लोणकरशी ओळख झाली. शुभमने गौतमचं लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी स्नॅपचॅट च्या माध्यमातून बोलणं करून दिलं होतं. त्यानंतरच तो या हत्याकांडात सहभागी झाला. त्याच्या या अटकेमुळे आता सिद्दिकी हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची संख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे. मात्र हत्या झाल्या पासून ते अटक होईपर्यंत शिवकुमार गौतम याचा घटनाक्रम कसा होता आणि पोलीस त्याच्यापर्यंत कसे पोहोचले पाहूया…
बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्यानंतर गौतम गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला. त्यानंतर वाटेत मोबाईल फेकून तो थेट पुण्याला आला. पुण्याहून झाशीला गेला. तिथून लखनऊमार्गे तो बेहराईचला पोहोचला. प्रवासादरम्यान पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने अनोळखी लोकांच्या मोबाईलद्वारे साथीदारांना संपर्क केला. त्याचबरोबर त्याने तिथे पोहोचण्याआधीच नेपाळला पलायन करण्याची आणि राहण्याची व्यवस्था साथीदारांमार्फत केली होती. दरम्यान अटक करण्यात आलेल्या इतर चार आरोपींवर देखील पोलीस अनेक दिवसांपासून लक्ष ठेवून होते. हे आरोपी दहा तारखेच्या आत गौतमला भेटणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचला आणि नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गौतमला पोलिसांनी त्याला अटक केली.
मुंबई पोलिसांच्या अनेक पथकांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता, त्यामुळेच मुख्य शूटर शिवकुमार गौतमला पकडण्यात यश आलं. त्याच्याकडून सुरू असलेल्या चौकशीत सिद्दिकी यांच्या हत्येसाठी त्याला दहा लाख रुपये मिळणार असून दर महिन्याला ठराविक रक्कम दिली जाणार होती, हे समोर आलंय. त्यामुळेच आता या हत्येच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश कधी येणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.