दुचाकी वरून जाताना वाटेत वाद झाल्याने प्रेमीयुगूलाने चक्क कालव्यात उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात घडला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक तासांपासून या दोघांचा मंचर (manchar police) पोलिसांकडून शोध सुरू असून हे दोघेही सध्या बेपत्ता आहेत. तरी या सर्व प्रकाराची साक्षीदार असलेली तेरा वर्षांची लहान मुलगी मात्र या घटनेमुळे मानसिक धक्क्यात गेली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
ही घटना पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी-टाकेवाडी या परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, कविता सुनील पारधी आणि पप्पू लक्ष्मण खंडागळे हे प्रेमी युगुल दुचाकी वरून ठाकर वाडीकडे येथे जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत कविताच्या मामाची 13 वर्षांची मुलगी दिव्या राजाराम काळे देखील होती. टाकेवाडी डिंभे डाव्या कालव्या जवळ आल्यानंतर कविता पारधी आणि पप्पू खंडागळे या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यानंतर रागाच्या भरात कविता पारधीने कालव्यातील पाण्यात उडी मारली. तिला वाचवण्यासाठी पप्पू खंडागळे यानी देखील पाण्यात उडी घेतली. या दोघांनाही पोहोता येत असल्याचं दिव्याला माहीत होतं. त्यामुळे काही वेळात ते बाहेर येतील असं तिला वाटलं. पण बराच वेळ उलटल्यानंतरही हे दोघे बाहेर आलेच नाहीत. त्यामुळे घाबरलेली दिव्या जवळच राहणाऱ्या रामदास भिमाजी चिखले यांच्या शेडमध्ये अंधारात जाऊन बसली. ती रात्रभर तिथेच होती. सकाळी शेतकरी रामदास चिखले शेडमध्ये आल्यानंतर त्यांनी दिव्याला पाहिलं. तिची विचारपूस केल्यानंतर घडलेला प्रकार समजला. त्यानंतर चिखले यांनी गावातील लोकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर गावचे पोलीस पाटील आणि इतर ग्रामस्थांकडून या दोघांचाही शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान या प्रकरणात आता मंचर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडूनही घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे.
कालव्यातील पाणी कमी करणार
डिंभे डाव्या कालव्यात 400 क्युसेक्स वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे बेपत्ता झालेल्या कविता आणि पप्पू यांचा शोध घेण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळेच घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आता मंचर पोलिसांनी घोडेगाव तहसीलदारांना पत्र देऊन कालव्यातील पाणी कमी करण्याची विनंती केली आहे. लवकरच हे पाणी कमी करून मग या दोघांचाही शोध घेतला जाईल. दरम्यान या दोघांमध्ये कोणत्या गोष्टीवरून वाद झाले होते ? आणि घटनेची साक्षीदार असलेल्या दिव्या हिने जे काही सांगितलं ते तसंच घडलं आहे का ? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.