पुण्यातून दररोज टोळक्याने हल्ला करून जखमी केल्याच्या, खूनाचा प्रयत्न केल्याच्या आणि खून केल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता पुर्व वैमनस्यातून टोळक्याने तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बिबवेवाडीतील इंदिरानगर येथे घडली.
या हल्ल्यात रोहित राजेंद्र गाडे (वय 34 रा.बिबवेवाडी ) हा तरुण गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी टोळक्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार गणेश लावडे, प्रथमेश कचरे, श्रेयस कांबळे (सर्व रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्यावर गु्न्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी (२० ऑक्टोबर) रोजी इंदिरानगर परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते
त्यावेळी त्यांचे गणेश लावडे याच्याशी वाद झाले. त्यानंतर गणेश हा साथीदारांसह इंदिरानगर येथे आला. त्यावेळी या टोळक्याच्या हातात बांबू आणि लाकडी दांडके होते. ‘आज याला जिवंत सोडायचं नाही, याला संपवून टाका’, अशी धमकी देऊन या टोळक्यांनी फिर्यादींवर हल्ला केला. त्यावेळी मारहाण करताना रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू फिर्यादींच्या डोक्यात मारला. ज्यामुळे फिर्यादी हे गंभीर जखमी झाले. त्या हे टोळके पसार झाले.
याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून बिबवेवाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहेत.