महाराष्ट्र विधानसभा 2024 (VIDHANSABHA 2024) च्या निवडणुकीत 288 जागांसाठी तब्बल 4000 पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी विजयी तर 288 उमेदवार होणार आहे. मात्र बाकीच्या उमेदवारांवर डिपॉझिट (deposit) जप्त होण्याची नामुष्की ओढवणार आहे. नेहमीच निवडणुकांमध्ये विरोधी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल अशी वक्तव्य केली जातात. मात्र डिपॉझिट जप्त होतं म्हणजे नेमकं काय होतं ? आणि डिपॉझिट जप्त होऊ नये, यासाठी उमेदवाराला किती मतांची गरज असते, हे जाणून घेऊया.
डिपॉझिट म्हणजे काय ?
भारतात कुठल्याही नागरिकाला निवडणूक लढवण्याचा हक्क आहे. त्यामुळेच राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतातच मात्र त्यांच्याबरोबरच अनेक बंडखोर आणि अपक्ष उमेदवार देखील निवडणूक लढवतात. प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना डिपॉझिट रक्कम भरावी लागते. सर्वसाधारण गटातील उमेदवारांना प्रत्येकी 10 हजार रुपये, तर अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 5 हजार रुपये उमेदवारी अर्ज दाखल करताना जमा करावे लागतात, त्यालाच अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट असं म्हणतात.
केव्हा होतं डिपॉझिट जप्त ?
कोणत्याही निवडणुकीत सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांपैकी एकषष्ठांशापेक्षा कमी मतं मिळाल्यास त्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होतं. या मतांची गोळा बेरीज करताना केवळ उमेदवारांना मिळालेली मतं विचारात घेतली जातात. ‘नोटा’ला मिळालेली मतं विचारात घेतली जात नाहीत.
डिपॉझिट परत मिळणार
कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याचा अर्ज अवैध झाल्यास किंवा अर्ज मागे घेतल्यास डिपॉझिट रक्कम परत मिळते. त्याचबरोबर निवडून आलेल्या आणि एकषष्ठांशापेक्षा जास्त मतं मिळालेल्या उमेदवारालाही त्याने भरलेलं डिपॉझिट परत मिळतं. केवळ एकषष्ठांशापेक्षा कमी मतं मिळालेल्या उमेदवाराचंच डिपॉझिट जप्त होतं.