राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलेला आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे अजय बारस्कर महाराज यांनी देखील आपली मागणी लावून धरली आहे. दरम्यान बारस्कर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत आपल्याला धमकीचे फोन येत आहेत, अशी माहिती देत फोन करणाऱ्यांची नावे देखील उघड केली.
अजय बारस्कर यांची गाडी पंढरपूर जाळल्याची घटना घडल्यानंतर ते आणखी आक्रमक झाले आहेत. त्याचबरोबर विरोधकांकडून त्यांना धमकीचे फोन येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबतीत पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर माहिती दिली. बारस्कर म्हणाले की, ‘मी ती गाडी जपानहून आयात केली होती. या गाडीने मी अनेक आजारी लोकांची, वारकऱ्यांची सेवा केली आहे. मग ही गाडी मी का जाळेल ? माझी गाडी आपोआप जळली असा दावा केला गेला. पण ती गाडी आपोआप जळू शकतच नाही. तसेच या प्रकरणानंतर अनेक जणांचे मला फोन आले. धमक्या देखील दिल्या. छत्रपती संभाजी नगर मधील रमेश पाटील, नाशिक मधून सुधीर काजळे, हिंगोलीतून विष्णू जाधव आणि नलावडे आडनावाच्या एका व्यक्तीने मला फोन केले. या लोकांनी आम्हीच तुमची गाडी जाळली असं सांगितलं. त्याचबरोबर आमचं सरकार आल्यावर तुझं कुटुंब उध्वस्त करु, अशा धमक्या देखील दिल्या.’ बारस्कर यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ? आणि यांनी उघड केलेल्या या नावांची चौकशी आणि या प्रकरणाचा संपूर्ण तपास होणे गरजेचे झाले आहे.
फडणवीसांच्या बंगल्या बाहेर बारस्करांचे आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अजय बारस्कर हे देखील आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर बसून त्यांनी आंदोलन केले. ‘मी फडणवीसांचा माणूस आहे असा शिक्का माझ्यावर लावण्यात आलाय. त्यामुळे आता मी थेट सागर बंगल्यासमोरच बसलो आहे. मराठवाड्यातील मराठ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी मी इथे बसलो आहे. आरक्षण हे मारुतीच्या मंदिरात मिळत नसतं तर सरकारच ते देऊ शकतं. त्यांच्यात हिंमत नसेल पण माझ्यात हिंमत आहे. म्हणून मी इथे बसलो आहे’, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.