मुंबई: शिवसंग्रामचे नेते, आमचे सहकारी, माजी आमदार श्री विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले अतिशय संघर्षातून आयुष्य जगत, गरिबीतून दिवस काढत विनायकराव मेटे यांनी आपले आयुष्य उभे केले होते. समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देताना मागास भागाचा विकास आणि मराठा समाजाचे कल्याण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष उभारला.
तळागाळातील विषयांची साकल्याने माहिती त्यांना असायची आणि त्यातून एखाद्या गोष्टीसाठी पाठपुरावा कसा करायचा हे त्यांना ठावूक असायचे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात त्यांनी आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले. मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपले आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गेल्याच महिन्यात त्यांचा वाढदिवस साजरा झाला. अगदी या आठवड्यात सुद्धा मंत्रालयात विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि आज काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेलं असल्याची भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.