मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचे पार्थिव सायंकाळी मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात पार्थिव शरीर नातेवाईकांच्या स्वाधीन करुन त्यांच्या निवासस्थानी रवाना करण्यात आले.
पनवेल येथील दिलीप देसले आणि डोंबिवली येथील संजय लेले यांचे मृतदेह मुंबई विमानतळावर दाखल होताच महाराष्ट्र सरकारतर्फे श्रद्धांजली अर्पण करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी विमानतळावर उपस्थित राहून शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दिलीप देसले यांचा मृतदेह पनवेल येथील त्यांच्या निवासस्थानी आणताच कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. उपस्थितांनाही हे दृश्य पाहून दुःख अनावर झाले. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अंत्यविधीला हजर राहून देसले यांना श्रद्धांजली वाहिली. देसले यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी झाली होती.
संजय लेले यांचा पार्थिवदेह त्यांच्या डोंबिवलीतील निवासस्थानी आणण्यात आला. तेव्हा या भागात दुःखाचे वातावरण पसरले. अंत्यविधीला सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
डोंबिवली येथील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी या तीन मित्रांचे पार्थिव अत्यंत शोकाकुल वातावरणात डोंबिवलीत दाखल झाले. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता येण्यासाठी भागशाळा मैदान येथे ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी लोकांनी अंत्यदर्शन घेतले.