राणा दांपत्याचा मुक्काम कोठडीतच ! २९ एप्रिल रोजी सुनावणी

405 0

मुंबई- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजही दिलासा मिळालेला नाही. राणा दांपत्याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. जामिनाच्या याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्या वतीनं राज्य सरकारला देण्यात आले आहेत. त्यानंतरच सुनावणी घेण्याची तारीख ठरवू, असं मुंबई सत्र न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे राणा दांपत्याचा मुक्काम 29 तारखेपर्यंत कारागृहातच असणार आहे.  

आज राणा दांपत्याकडून मुंबईतील सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर सुनावणी सुरू असताना राणा दांपत्याचे वकील अ‍ॅड रिझवान मर्चंट यांनी जामीन देण्याची मागणी केली. तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीनाला विरोध केला. आधी मॅजिस्ट्रेट कोर्टातून अर्ज मागे घ्यावा नंतर सुनावणी करावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

29 एप्रिलला सरकारी वकील मुंबई सत्र न्यायालयात आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडतील आणि त्यानंतर 29 एप्रिलला जामिन अर्जावर सुनावणी होईल. याआधी वांद्रे न्यायालयातील जामीन अर्ज मागे घ्यावा लागेल तरच सत्र न्यायालयात सुनावणी होईल. दरम्यान आम्ही वांद्रे न्यायालयातील अर्ज मागे घेत आहेत असं राणा दाम्पत्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी कोर्टात स्पष्ट केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. दोन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला.

पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!