विधानसभा निवडणुकीत महायुतीने भरघोस यश मिळवलं. याच यशाच्या जोरावर आता महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. भाजप ने पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने जागा जिंकल्या आहेत. मात्र या निवडणुकीत ठाकरे (uddhav thackeray) सोबत असते तर यापेक्षाही जास्त बहुमत मिळालं असतं, असं वक्तव्य भाजपच्या टीका जेष्ठ नेत्याने केलं आहे. ज्यांचं नाव आहे रावसाहेब दानवे. (Raosaheb Danve)
भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरेंबाबत केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘यंदाच्या निवडणुकीत ठाकरे सोबत असते तर आत्ता मिळालेल्या बहुमतापेक्षा जास्तीचं बहुमत आम्हाला मिळालं असतं’, असं वक्तव्य दानवेंनी केलं आहे.
काय म्हणाले रावसाहेब दानवे ?
‘2019 मध्ये सेना-भाजप युतीला जवळपास 165 ते 167 जागा मिळाल्या होत्या. मात्र तेव्हा संजय राऊतांच्या बोलण्यावरून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेली. जर आत्ताचा ठाकरे गट तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेला नसता तर असा कारभार केला असता, जो आधी 2014 ते 19 मध्ये झाला होता. त्याच कारभाराच्या आधारावर आज जे बहुमत मिळालंय त्यापेक्षा अधिक जास्त बहुमत आम्हाला मिळालं असतं’, असं मतं रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे.