अहमदाबाद- गुजरातमधील मोरबी येथील हलवड भागात एका मिठाच्या कंपनीमध्ये भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली ३० मजूर अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हलवड जीआयडीसीतील सागर सॉल्ट नावाच्या कंपनीत ही दुर्दैवी घटना घडली. या कंपनीत मीठ तयार केले जाते. ही भिंत अतिशय जीर्ण झाल्याने ती कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कंपनीतील कामगार मिठाच्या गोण्या रचत होते. अचानक भिंत कोसळल्यामुळे तेथे काम करणारे मजूर भिंतीखाली गाडले गेले.
मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु असून आतापर्यंत १२ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जेसीबीच्या सहाय्याने दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. आणखी काही मजुरांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना राज्यमंत्री ब्रिजेश मेरजा यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार उभे असल्याचे म्हटले आहे.