बेपत्ता पाकिस्तानीवरून फडणवीस, शिंदेंची परस्परविरोधी विधाने

337 0

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा शोधला जात आहे. राज्यातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली होती. मात्र, आता पाकिस्तानी नागरिकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परस्परविरोधी विधाने केल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असून त्यांचा कुठेही शोध लागलेला नाही, या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या माहितीविषयी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाला नसल्याचा दावा पुण्यात बोलताना केला.

मात्र, याउलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा येथे बोलताना लपून बसलेल्या १०७ पाकिस्तानींना पोलीस शोधतील अन् तिथेच ठोकतील, असा कठोर इशारा दिला. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांची नेमकी काय स्थिती आहे, याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे असलेले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेली माहिती खरी की, खुद्द मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचा केलेला इन्कार नेमके काय खरे, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना १७ एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे फर्मान
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याची खबर मिळाली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परस्परविरोधी विधानांची चर्चा होऊ लागली आहे.

Share This News
error: Content is protected !!