State Water storage

पहलगाम हल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप ; सर्व पर्यटकांना सुरक्षित परत आणणार

251 0

मुंबई : पहलगाम हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा धर्म विचारून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला अतिशय चीड आणणारा आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी याबाबत आपला तीव्र संताप व्यक्त केला. देशात आणि समाजात उभी फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे. या हल्लेखोरांवर अतिशय
कठोर कारवाई होईल, याविषयी आपल्या मनात कुठलीही शंका नसल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्रातीय सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.

फडणवीस म्हणाले की, पहलगाम हल्ल्यातील सहा पर्यटकांचे मृतदेह बुधवारी सायंकाळी राज्यात आणले जातील. मुंबईत आशीष शेलार आणि मंगलप्रभात लोढा हे दोन मंत्री सर्व व्यवस्था पाहत आहेत. तर पुण्यात केंद्रीय नागरी उड्डायण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जातीने लक्ष ठेवून आहेत. विमानतळावरील व्यवस्थेची जबाबदारी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर सोपवली आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन स्वतः श्रीनगरला पोहोचले आहेत. ते पर्यटकांना सुखरूपपणे आणण्याची व्यवस्था सांभाळतील.

जम्मू काश्मिरात सध्या अडकून पडलेल्या सर्व पर्यटकांना परत आणले जाईल. या पर्यटकांनी
सोशल मीडिया अथवा मेसेजद्वारे प्रशासनाशी संपर्क साधला आहे. इंडिगोच्या विशेष विमानाने काही लोकांना आजच परत आणले जाईल. दिवसभर आढावा घेऊन उद्या एखादे विशेष विमान उपलब्ध करून देण्याची विनंती आपण मुरलीधर मोहोळ यांना केली आहे. तिकिटांची सर्व व्यवस्था सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सर्व पर्यटक घाबरले असले तरीही वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित आहेत. त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात परत आणण्याचा प्रयत्न आहे.

या घटनेत बळी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत केली जाईल. पैशाने कुणाचेही जीवन परत येत नाही, पण एक आधार म्हणून ही मदत त्यांना दिली जाईल. सरकार जे काही करता येईल, ते करीत असून आपण स्वतः यामध्ये लक्ष घालत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवारही त्यांच्या परीने लक्ष ठेवत आहेत.

जम्मू काश्मीरचा मोठ्याप्रमाणात विकास झाल्याने पर्यटक तिकडे जात आहेत. पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. खोऱ्यातील फुटीरवाद आणि दगडफेकीच्या घटना बंद झाल्या आहेत. त्यामुळेच बिथरलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. एलजींकडे कारभार होता तोपर्यंत हल्ला झाला नव्हता, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Share This News
error: Content is protected !!