मुंबई: भारतीय हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि राज्यात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर समुद्र, नदी किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलं आहे.
जिल्हा, राज्य प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. जीवित, वित्तहानी होणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. राज्य सरकारनेही एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस, महसूल आदी बचाव, मदत यंत्रणांना सतर्क ठेवून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळेल याची निश्चिती करावी असं देखील पवार म्हणाले
अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत बचाव, मदत कार्यात विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य, मदत करावी. राज्यातील नागरिकांची जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.