राज्यात मान्सूनने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. शहरात पाणीकपात न केल्यास खडकवासला धरण साखळीतील साठा 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच राहील, असा इशारा पाटबंधारे विभागाने महापालिकेला दिला होता.
अखेर पालिका प्रशासनाने सोमवारपासून (दि.4 जुलै) शहरात दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे जवळपास निश्चित झाले होते. खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले होते. धरणात पंधरा जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेला घ्यावाच लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र त्याबाबत आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लांबणीवर पडत होती. आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन आढावा घेतला. त्या वेळी पाणीकपात करण्याचा आणि त्याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्याचे निश्चित करण्यात आले. पाणीकपातीचे वेळापत्रक आज शुक्रवारी जाहीर केले जाणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.