मुंबईच्या पर्यावरण संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापक आणि दीर्घकालीन उपाययोजनांची घोषणा केली आहे. मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणे हे या योजनांचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्यासाठी गारगाई, दमणगंगा–पिंजाळ यांसह विविध जलप्रकल्पांना गती देण्यात येत आहे.
शहरातील सांडपाणी थेट समुद्रात जाणे रोखण्यासाठी 16 हजार कोटी रुपयांच्या सांडपाणी शुद्धीकरण (एसटीपी) नेटवर्कचे काम सध्या सुरू आहे. येत्या दीड ते दोन वर्षांत हे प्रकल्प पूर्ण होतील, ज्यामुळे मुंबईच्या समुद्रात प्रदूषित पाणी सोडले जाणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला
मिठी नदीसह मुंबईतील इतर नद्यांच्या शुद्धीकरणासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून, कचरा व्यवस्थापनावरही विशेष भर देण्यात येत आहे. शहरातील डम्पिंग ग्राऊंड्सचे कॅपिंग करून बायोमायनिंग करण्यात येणार आहे.
याशिवाय, झिरो गार्बेज योजना राबवली जाणार असून, कचऱ्यापासून वीज निर्मितीचे प्रकल्प सुरू करून स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन दिले जाईल. मुंबईसाठी तयार करण्यात आलेल्या 17 हजार कोटी रुपयांच्या क्लायमेट ॲक्शन प्लॅनमुळे शहराला सर्क्युलर इकॉनॉमीकडे नेण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.