अयोध्या दौरा स्थगितीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचले ! म्हणाले…

360 0

मुंबई- गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची कळ काढली आहे. राज ठाकरे यांना अयोध्या दौरा रद्द करण्याची नामुष्की यावी असे मी काही म्हणणार नाही पण भाजपने असे का करावे असा प्रश्न विचारून त्यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे. संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावर तिरकस शब्दात टोलेबाजी केली.

संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात नेमक्या काय अडचणी आल्या, हे मला माहीत नाही. मात्र भाजपने त्यांच्या बाबतीत असं का करावं? यातून काही लोकांना शहाणपण आलं तर बरं होईल. कारण यामुळे महाराष्ट्रातील नेतृत्वाचं आणि महाराष्ट्राचं नुकसान होतं. प्रत्येक वेळी भाजप राजकीय स्वार्थासाठी अशा खेळी करते. आपण वापरले जात आहोत हे काही लोकांना उशीरा समजले आहे. आम्हाला या मुद्द्यावरून राजकारण करायचं नाही. आमचा एक मदत कक्ष आहे, कोणाला देवदर्शनाला जायचं असेल तर आम्ही मदत करतो,’ असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

दौऱ्याची घोषणा होताच उत्तर भारतातून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यात आला. अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे. “आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं”, असं भाजप खासदार म्हणतात. तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!