राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षाचे आमदार यांनी दिवंगत नेते अजित पवार (AJIT PAWAR) यांच्या विमान अपघात प्रकरणावरून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे (SUNIL TATKARE) आणि नरेश अरोरा (NARESH ARORA)यांची नावे घेत संशय व्यक्त केला.
रोहित पवार(ROHIT PAWAR) यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून अजित पवार(AJIT PAWAR) यांना पक्षात एकटे पाडले जात असल्याची भावना होती. या संदर्भात त्यांनी कुटुंबीयांशीही चर्चा केली होती. अपघाताच्या आदल्या दिवशी एका महत्त्वाच्या फाईलवर सही व्हावी, अशी एका वरिष्ठ नेत्याची इच्छा होती. त्या कारणामुळे त्यांना निघण्यास उशीर झाला आणि अखेर विमानाने प्रवास करावा लागला. संबंधित विमानाचे बुकिंग सायंकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
नरेश अरोरा (NARESH ARORA) यांच्या कंपनीचा शेकडो कोटी रुपयांचा करार अजित पवार रद्द करण्याच्या तयारीत होते, असा दावा रोहित पवार (ROHIT PAWAR)यांनी केला. या मुद्द्यावरून वाद निर्माण झाले होते. त्यामुळेच दादा रस्त्याने न जाता विमानाने गेले, असा त्यांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी बारामतीतील एका बैठकीत अरोरा यांच्या कन्सल्टन्सी कंपनीचे प्रतिनिधी आले होते आणि त्यावेळीही अजित पवार यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती, असे त्यांनी नमूद केले. २७ तारखेलाही या कराराबाबत चर्चा झाली होती आणि काही नेते हे काम सुरू ठेवण्याच्या भूमिकेत होते, तर अजित पवार त्याला विरोध करत होते, असे रोहित पवार म्हणाले.
तसेच, २७ तारखेला सुनील तटकरे स्वतः उशिरापर्यंत दादांसोबत होते, असा उल्लेखही त्यांनी केला.रोहित पवार यांनी पुढे सांगितले की, एका फाईलसंदर्भात प्रफुल्ल पटेल (PRAFUL PATEL)यांचा फोन आला होता, ज्यामुळे अजित पवार यांना निघण्यास उशीर झाला. याबाबत प्रमोद हिंदूराव (PRAMOD HINDURAO)यांनीही उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले. आज कुणीतरी दादांच्या बाजूने बोलत आहे, असे मला वाटते, असे म्हणत त्यांनी संबंधित नेत्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला.
दरम्यान, या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून संबंधित नेत्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.